स्नेहमिलन सोहळ्यातून पुन्हा उजळल्या शालेय आठवणी
वढोलीत २००९–१०च्या सत्रातील विद्यार्थी भावनिक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
काळाच्या ओघात आयुष्याची दिशा बदलली, जबाबदाऱ्या वाढल्या; मात्र शालेय जीवनातील निरागस मैत्री आणि आठवणींचा ओलावा कधीच कमी होत नाही, याचा प्रत्यय वढोली येथे आला. सरस्वती विद्यालय, वढोली येथील २००९–१० या शैक्षणिक वर्षातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा तब्बल १६ वर्षांनंतर ( दि. २९ मार्च ) उत्साहात आणि भावनिक वातावरणात पार पडला.
शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक विद्यार्थी शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि संसारात व्यस्त झाला. मात्र तब्बल सोळा वर्षांनंतर पुन्हा एकदा जुने मित्र-मैत्रिणींना भेटण्याचा योग जुळून आला आणि या भेटीतून आठवणींचा जणू झरा वाहू लागला. अनेक वर्षांनी एकमेकांना भेटताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधानाचे भाव उमटले होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. त्यानंतर स्वागतगीताणे उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील गमतीजमती, शिक्षकांचा धाक, वर्गातील खोड्या आणि मैत्रीचे किस्से आठवत जुन्या आठवणींना उजाळा दिला. “सोळा वर्षांनंतर पुन्हा सर्व मित्र एकत्र येणे हा आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे. आज पुन्हा आम्ही दहावीत असल्याचा भास होत आहे,” अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या.
या स्नेहमिलनासाठी विद्यार्थ्यांनी स्वखर्चाने निधी गोळा करून कार्यक्रमाचे आयोजन केले तसेच आपल्या जुन्या शाळेला उपयुक्त वस्तू भेट म्हणून दिल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निखील नामेवार, प्रसाद माडूरवार, रुपेश सोनटक्के, राकेश रेंकुटलवार, उमेश उपासे, राजू कीनेकार, रीना मडावी, दर्शना पाल, विना गौरकार, रुपाली गोहणे, संगीता चौधरी आणि रीना झाडे यांनी विशेष परिश्रम घेतले.



