दोन वर्षात १२बळी घेणारा नवेगाव टोलनाका ठरतोय जीवघेणा
_सुरजागड वाहतुकीवर प्रशासनाची मौनाची साथ.?

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपीपरी :_ राज्यातील अनेक टोल नाक्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक भार पडत असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत असून विविध ठिकाणी टोल बंद करण्याची मागणीही होत आहे. मात्र गोंडपिपरी तालुक्यातील नवेगाव-वाघाडे येथील टोल नाका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. येथे टोल नाका गेल्या पाच वर्षांपासून बंद अवस्थेत उभा असून तोच आता प्रवाशांच्या जीवावर उठल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
टोल नाका कार्यरत नसल्यामुळे येथे कोणतीही सुरक्षा व्यवस्था,वाहतूक नियंत्रण किंवा प्रकाश व्यवस्था व्यवस्थित दिसून येत नाही.रात्रीच्या वेळी परिसर अंधारात बुडालेला असतो.त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या धोक्याचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान,सुरजागड प्रकल्पातून लोहखनिज घेऊन जाणाऱ्या जड वाहनांची या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते.मात्र टोल बंद असल्यामुळे या वाहनांवर कोणतेही नियंत्रण नसल्याचे दिसून येते. त्यामुळे हा टोल सुरजागड कंपनीच्या ट्रकांसाठीच जणू मोकळा ठेवण्यात आला आहे का आणि प्रशासनाची त्यांना मौनाची साथ आहे का?, असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
नवेगाव-वाघाडे टोल परिसरात अपघातांचे प्रमाणही चिंताजनक आहे. मागील दोन वर्षांत विविध अपघातांमध्ये तब्बल १२ जणांना आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे हा टोल तात्काळ सुरू करून सुरक्षा व्यवस्था निर्माण करावी किंवा कायमस्वरूपी हटवावा,अशी ठाम मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
प्रशासन सुरजागड कंपनीवर मेहरबान असल्याचे दिसून येत आहे. बल्लारपूर _नवेगाव (वाघाडे) राष्ट्रीय महामार्गावरील एकतर टोल तात्काळ सुरू करून सुरक्षा व्यवस्था निर्माण करावी किंवा कायमस्वरूपी हटवावा,अशी साधी मागणी आहे. मात्र प्रशासन कुंभकर्णी झोपेत आहे. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी लवकरच तीव्र आंदोलन करण्यात येईल.
_ *सुरज माडूरवार,तालुका प्रमुख शिवसेना गोंडपिपरी*



