ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशनचे तातडीने ‘पर्यावरणीय ऑडिट’ करा 

खा. धानोरकर यांनी 'शुन्य प्रहार'मध्ये वेधले संसदेचे लक्ष

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :_ “संपूर्ण महाराष्ट्राला प्रकाश देणारा चंद्रपूर जिल्हा आज स्वतः प्रदूषणाच्या अंधारात जळत आहे,” अशा तीव्र शब्दांत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आज लोकसभेच्या ‘शुन्य प्रहार’ मध्ये चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशनमुळे निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीवर केंद्र सरकारचे लक्ष वेधले. राज्याचे ऊर्जेचे इंजिन मानले जाणारे हे केंद्र आज तिथल्या सामान्य जनतेसाठी ‘मृत्यूचा सापळा’ बनत असून, या प्रकल्पातील जुन्या वीज संचांमुळे होणारे हवेचे प्रदूषण आता मर्यादेच्या पलीकडे गेले असल्याचे त्यांनी सभागृहात ठामपणे मांडले.

प्रदूषणामुळे चंद्रपूरमधील नागरिक, विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना श्वसनाचे गंभीर आजार जडत असून इथली सुपीक शेती राखेमुळे नापीक होत आहे, याकडे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सरकारचे लक्ष वेधले. अनेक वीज संच आपली विहित मुदत संपवूनही अद्याप कार्यरत असल्याने पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होत आहे. यावर उपाय म्हणून या संपूर्ण प्रकल्पाचे तातडीने ‘उच्चस्तरीय तज्ज्ञ समिती’ मार्फत पर्यावरणीय ऑडिट करण्यात यावे, अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी लावून धरली.

शेवटी, जे वीज संच प्रदूषण नियंत्रण मानकांचे उल्लंघन करत आहेत, ते टप्प्याटप्प्याने बंद करून त्या ठिकाणी ‘आधुनिक आणि प्रदूषणमुक्त संच’ बसवण्याची मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली. “चंद्रपूरने देशाला आणि राज्याला वीज दिली, आता केंद्र सरकारने चंद्रपूरच्या जनतेला शुद्ध हवा मिळवून द्यावी,” असा कडक इशारा देत या प्रलंबित प्रश्नावर त्वरित सकारात्मक निर्णय घेण्याचे आवाहन त्यांनी ‘झिरो अवर’च्या माध्यमातून केंद्र सरकारला केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये