आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे मृत विद्यार्थ्यांच्या परिवारांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाखांची मदत
वैनगंगा नदीत बुडून मृत्यू झालेल्या दोन एमबीबीएस शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परिवारांना आर्थिक दिलासा

चांदा ब्लास्ट
आ. मुनगंटीवार यांनी पुढाकार घेत मुख्यमंत्र्याकडे केली होती मदतीची मागणी
चंद्रपूर – गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदीत बुडून मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत मिळाली आहे. गोपाल गणेश साखरे (बुलढाणा) आणि स्वप्निल उद्धवसिंह शिरे (छत्रपती संभाजीनगर) या दोन विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. आमदार मुनगंटीवार यांनी यासंदर्भात केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे.
१० मे २०२५ रोजी गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएस शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेमुळे संबंधित विद्यार्थ्यांच्या कुटुंबांवर मोठा आघात झाला होता आणि संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त करण्यात आली होती.या घटनेनंतर आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेत मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. तसेच मुख्यमंत्री यांचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्याशीही त्यांनी दूरध्वनीवर चर्चा करून या कुटुंबांना मदत मिळावी यासाठी पाठपुरावा केला होता.
आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर शासनाने ४ मार्च २०२६ रोजी आदेश जारी करून गोपाल गणेश साखरे (बुलढाणा) आणि स्वप्निल उद्धवसिंह शिरे (छत्रपती संभाजीनगर) यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून मंजूर करण्यात आली आहे.
या निर्णयामुळे दुर्दैवी घटनेत आपल्या मुलांना गमावलेल्या कुटुंबियांना काही प्रमाणात आर्थिक दिलासा मिळाला असून आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दाखविलेल्या संवेदनशीलतेबद्दल कुटुंबीयांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे



