आ. सुधीर मुनगंटीवार यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टर २० हजार बोनस देण्याची सभागृहात आग्रही मागणी
आ.मुनगंटीवार यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटाकडे शासनाचे वेधले लक्ष

चांदा ब्लास्ट
आ. मुनगंटीवार यांच्या मागणीची तात्काळ दखल; राज्यमंत्री कदम यांचे सकारात्मक आश्वासन
चंद्रपूर – राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत धान उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका मांडत प्रति हेक्टर २० हजार रुपये धान बोनस जाहीर करण्याची आग्रही मागणी सभागृहात केली.पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आदी जिल्ह्यांतील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले असून, त्यांच्या नुकसानीची दखल घेत तातडीने मदत देण्याची गरज असल्याचे त्यांनी सभागृहात अधोरेखित केले.
आ.मुनगंटीवार यांनी सांगितले की, राज्यशासनाने २०२४-२५ मध्ये घेतलेल्या निर्णयानुसार नोंदणीकृत धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर २० हजार रुपये बोनस जाहीर करण्यात आला. कधी नव्हे ते १५८६.७१ कोटी रुपये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुतीच्या सरकारने शेतकऱ्यांना धानाचा बोनस दिला.२०१३ मध्ये ३०० कोटी पासून झालेली धानाच्या बोनसची सुरुवात मागच्या वर्षी १५८६.७१ कोटी रुपये वितरण करण्यापर्यंत झाली. मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची १५ डिसेंबर २०२५ ला भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी अतिरिक्त मुख्य सचिव अन्न व नागरी पुरवठा यांना स्पष्ट निर्देश दिले. त्यामुळे शेतकऱ्यांना धानाचा बोनस प्रती हेक्टरी २० हजार रुपये तत्काळ द्यावे अशी आग्रही मागणी सभागृहात केली.
मात्र, यावर्षी अद्यापही या संदर्भात ठोस निर्णय न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होत आहे. अनेक शेतकऱ्यांवर आर्थिक ताण वाढला आहे.यावेळी त्यांनी शासनाचे या प्रश्नाकडे झालेले दुर्लक्ष अधोरेखित करत, शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा देण्यासाठी धानाचे बोनस जाहीर करण्याची अत्यंत आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले.
धान उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करत राहणार असल्याचा निर्धार आ.मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाने तातडीने निर्णय घेतल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल आणि त्यांच्या आर्थिक अडचणी कमी होण्यास मदत होईल, असा विश्वासही मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
राज्यमंत्री योगेश कदम यांनी उत्तर देताना सांगितले की, धान बोनस या मागणीची गांभीर्याने दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन दिले. मंत्रिमंडळात सविस्तर चर्चा करून शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल, अशी सकारात्मक भूमिका त्यांनी मांडली. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनसच्या प्रश्नावर सरकारकडून लवकरच दिलासा मिळणार आहे.
शेतकऱ्यांच्या पाठीशी सदैव तत्पर
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे मागील वर्षी विदर्भातील शेतकऱ्यांना १६२८ कोटी रुपये धानाचे बोनस मिळालेले आहे.त्याचप्रमाणे, चंद्रपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांना २०२ कोटी रुपयांचा पीक विमा मिळवून देण्यातही आ. मुनगंटीवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी कायम संवेदनशील नेते म्हणून कायम पुढाकार घेतलेला आहे.



