सिमेंट रस्ता बांधकामात कंत्राटदाराला रान मोकळे!
संबंधित विभागाचे दुर्लक्ष ; मोठया प्रमाणात भ्रष्टाचार नागरिकांचा आरोप ?
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे
जिवती :- महाराष्ट्र व तेलंगणाच्या सीमेवर वसलेला अतिदुर्गम व नक्षलग्रस्त जिवती तालुका विकासापासून वंचित असताना येथील ढिसाळ राजकारण आणि अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे येथील विकासकामांवर अनिष्ट परिणाम होत असल्याचे जिवती शहरातील निकृष्ट रस्ते बांधकामातून पुढे आले आहे. या सिमेंट रस्त्याचे नियम डावलून बांधकाम केले जात असल्याने शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधीचा अपव्यय होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करीत आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जिवती शहरामध्ये रस्ते बांधकाम सुरू आहे. मात्र, निकष डावलल्याने रस्त्याची गुणवत्ता घसरली आहे. संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व अभियंते या विकास कामांकडे सर्रास पाठ फिरवित आहेत. जिथे काम सुरू आहे, तिथे दौरे न करताना केवळ कंत्राटदारांवर संबंधित विभाग भरोसा ठेवत असल्याचे कामातून दिसत आहे. शहर विकासाचा दृरदृष्टीकोन ठेवून येथील रस्त्याच्या कामासाठी शासनाकडून कोट्यवधींचा विकास निधी दिला. सदर विकास निधी अंतर्गत शहरात रस्ते, नाल्याचे बांधकाम जोमात सुरु आहे.
प्रथमताच या शहराला एवढा भरगच्च निधी मिळाल्याने नागरिकांमध्येही समाधान व्यक्त केल्या जात होते. मात्र सदर शासनाच्या निधीचा अपव्यय होताना दिसत आहे. हा सिमेंट रस्ता अंदाजपत्रकानुसार नसून प्रत्यक्ष कामांवर उपस्थित न राहणाऱ्या अभियंत्यांनी कंत्राटदारांशी साटेलोटे करुन रस्त्याचे थातूरमातूर काम जोमात चालू आहे,अनेकदा या कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली, तरी संबंधित वरिष्ठ त्याची दखल घेताना दिसत नाहीत. वरिष्ठांची तपासणी जैसे-थे असल्याचे दिसून येत आहे़.
संबंधित अधिकारी घटनास्थळाची पाहणी देखील करत नाहीत. यावरून रस्ते बांधकाम निष्कृष्ट होत असल्याचे बोलले जात आहे. याची उच्च स्तरीय चौकशी करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत. शहराच्या विकासासाठी शासनाने कोट्यावधी रुपयांचा निधी दिला आहे़. यातून कामे सुरू झाली मात्र नियमांचे उल्लंघन न करता ही कामे पूर्ण करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. लोकप्रतिनिधी या प्रश्नाकडे कानाडोळा करीत असले तरी नियमाधिन कामांतूनच शहराचा विकास होणार असल्याचे नागरिकांतून बोलल्या जात आहे.