15 फेब्रुवारी रोजी श्री संत नरहरी नाथ महाराज जीवन गौरव पुरस्कारचे वितरण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
श्रीसंत नरहरिनाथमहाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे श्रीक्षेत्र देऊळगावराजा येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व भव्य नामसंकीर्तन महोत्सवा चे आयोजन दिनांक ९ फेब्रुवारी २०२६ ते दिनांक १६ फेब्रुवारी २०१६ या कालावधीमध्ये संपन्न होत आहे.
महाराष्ट्रातील विद्वान वक्त्यांची प्रवचने, कीर्तने व दररोज हजारो भाविकांना भोजनप्रसाद अशा भव्य स्वरूपाचे आयोजन या कार्यक्रमाच्या अंतर्गत केलेले आहे. विशेष बाब म्हणजे यावर्षी महर्षि वसिष्ठ वेद विद्यालय व श्रीसंत तुकाराममहाराज वारकरी विद्यालयाचे प्रधानाध्यापक व श्रीसंत नरहरिनाथमहाराज संस्थानचे सेवक हरिभक्तपरायण वेदविभूषण श्री.उद्बोध महाराज पैठणकर यांना समाजप्रबोधनामध्ये, कीर्तन सेवेमध्ये कार्यरत होऊन बारा वर्षे पूर्ण होत आहेत यानिमित्त मुंबई येथील “श्रीमंत माऊली प्रतिष्ठान” या नामवंत संस्थेच्या वतीने श्रीउद्बोध महाराज पैठणकर यांचा “हरिकिर्तन सेवेचा तप:पूर्ती सन्मान सोहळा” आयोजित करण्यात आला आहे.
वारकरी संप्रदायातील अध्वर्यू, व सर्वांचे श्रद्धास्थान श्रीगुरु चैतन्यमहाराज देगलूरकर, महाराष्ट्रातील प्रतिभावान कीर्तनकार श्री.प्रमोदमहाराज जगताप, आदिशक्ती मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष रवींद्र भैय्यासाहेब पाटील, श्रीसंत मुक्ताबाई पालखी सोहळ्याचे प्रमुख रवींद्र महाराज हरणे व इतर सन्माननीय मान्यवरांच्या शुभहस्ते हा सन्मान सोहळा संपन्न होणार आहे.
१५ फेब्रुवारी २०२६ रोजी महाशिवरात्रीचे दिवशी सकाळी १० वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
वेद विद्यालय वारकरी विद्यालय याबरोबरच महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात व परदेशातही बारा वर्षांमध्ये कीर्तन, व्याख्यानाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे सामाजिक समरसतेचा उपदेश देण्याचे कार्य श्री.उद्बोधमहाराज यांचे द्वारा होत आहे, याचीच फलश्रुती म्हणून हा सन्मान सोहळा आयोजित केला गेला आहे.
याच दिवशी श्रीसंत नरहरिनाथमहाराज संस्थानच्या वतीने प्रतिवर्षी देण्यात येणारा श्रीसंत नरहरिनाथमहाराज जीवनगौरव पुरस्कार श्रीमहंत प्रमोदमहाराज जगताप यांना प्रदान करण्यात येणार आहे. व श्रीसंत मुक्ताबाई पालखी सोहळ्याचे प्रमुख ह.भ.प.श्री.रविंद्र महाराज हरणे यांचा एकसष्ठी निमित्त सन्मान सोहळाही आयोजित केला आहे.
तरी सर्व भाविकांनी या सन्मान सोहळ्यास उपस्थित राहावे असे श्रीसंत नरहरीनाथ महाराज सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आवाहन करण्यात येत आहे.



