शरद पवार महाविद्यालय येथे लँग्वेज, कल्चर आणि कम्युनिकेशन या विषयावर एक दिवसीय सेमिनार संपन्न
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
शरदराव पवार कला आणि वाणिज्य महाविद्यालय, गडचांदुर येथे “लँग्वेज, कल्चर आणि कम्युनिकेशन” या विषयावर एक दिवसीय सेमिनार नुकताच उत्साहात पार पडला. या सेमिनारचे आयोजन महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागामार्फत करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. आनंदराव अडबाले हे होते. तर तर प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजयकुमार सिंग, IQAC समन्वयक, सिनेट सदस्य तथा गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या व्यवस्थापन कमिटी चे सदस्य डॉ. संजय गोरे हे होते. या सेमिनार च्या मुख्य मार्गदर्शिका म्हणून KIIT विद्यापीठ,भुवनेश्वर, ओडिशाच्या सौ. स्मृती भारद्वाज ह्या होत्या आणि कार्यक्रम समन्वयक म्हणून प्रा. डॉ. सुनिल बिडवाईक हे व्यासपिठावर उपस्थित होते.
महाविद्यालयात आयोजित या एक दिवसीय सेमिनारमध्ये मुख्य मार्गदर्शिका सौ. स्मृती भारद्वाज यांचा सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. आनंदराव अडबाले यांचे हस्ते शाल आणि श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी मार्गदर्शिका सौ.स्मृती भारद्वाज यांनी भाषेचे सामाजिक, सांस्कृतिक आणि संवादात्मक महत्त्व अधोरेखित करत आजच्या जागतिकीकरणाच्या काळात प्रभावी संवादकौशल्याची गरज स्पष्ट केली. भाषेचा संस्कृतीशी असलेला घट्ट संबंध, संवाद प्रक्रियेमधील बदलते स्वरूप तसेच तंत्रज्ञानाचा भाषा वापरावर होणारा परिणाम या विषयांवर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात संवादकौशल्याचे महत्त्व विशद करत डिजिटल युगातील भाषिक जबाबदारीवरही त्यांनी भर दिला. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात आणि करिअर घडणीत प्रभावी संवादाची भूमिका स्पष्ट करण्यात आली. तसेच मातृभाषा, प्रादेशिक भाषा आणि इंग्रजी यांचा संतुलित वापर कसा करावा यावर यथोचित मार्गदर्शन करण्यात आले. एव्हढेच नाही तर संवादातील गैरसमज टाळण्यासाठी भाषिक संवेदनशीलतेचे महत्त्व सुद्धा अधोरेखित करण्यात आले. या सेमिनारमध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. सेमिनारला विद्यार्थी व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजयकुमार सिंह यांनी आयोजकांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रतीक वरकड यांनी केले तर आभार कार्यक्रम समन्वयक म्हणून प्रा. डॉ. सुनिल बिडवाईक यांनी मानले. प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. सेमिनारमुळे विद्यार्थ्यांना भाषिक जाणीव व संवादकौशल्याबाबत नवी दिशा मिळाल्याचे मत व्यक्त करण्यात आले.



