ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बोगस बियाणे व खतांची दरवाढ यामुळे शेतकऱ्यांचे होणारे शोषण त्वरित थांबवा

पावसाळी अधिवेशन - सदनात शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आ. वडेट्टीवार आक्रमक

चांदा ब्लास्ट

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये खतांच्या किमतीत 20 टक्क्यांनी घट झाली असून सत्ताधारी मात्र दर कपाती बाबत कुठलाही निर्णय न घेता शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण करीत आहे. अशातच गेल्या आठ वर्षाच्या काळात खते व बियाणे यांच्या किमतीत तिपटीने वाढ झाली. यामुळे कृषी प्रधान देशातील बळीराजाची आर्थिक परिस्थिती अत्यंत केवलवाणी झाली आहे. सोबतच कापसाचे बोगस बियाणे प्रचंड प्रमाणात विक्री केल्या जात असतानाही केवळ कारवाईचा फार्स दर्शवित खोट्या टोळी अस्तित्वात आणून वसुलीचा सपाटा शासनाच्या माध्यमातून होत आहे. शेतकऱ्यांच्या या गंभीर प्रश्नावर विशेष लक्ष देऊन शासनाने त्वरित कारवाई करावी व शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण थांबवावे अशी मागणी राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते आ. विजय वडेट्टीवार यांनी तरांकित प्रश्नातून विधानभवनात केली. यावर सकारात्मक पाऊल उचलून कडक कायदा करणार असल्याची ग्वाही कृषिमंत्री यांनी दिली.
पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा ठरला. यात विदर्भाचे कर्तृत्ववान आमदार विजय वडेट्टीवार यांनी राज्यात खतांची वाढलेली किंमत व शेतकऱ्यांची होणारी लूट यावर तारांकित प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले. यात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खतांच्या किमतीत  20 टक्क्यांनी झालेली घसरण सभागृहाच्या निदर्शनास आणून देत केंद्राकडून मिळणारे अनुदान हे अत्यल्प असून शेतकऱ्यांची सुरू असलेली लूट खतांचे दर कमी करून थांबवण्यात यावी अशी मागणी रेटून धरली. तसेच गेल्या आठ वर्षात खतांच्या किमतीत तिपटीने वाढ झाल्याने शेती व्यवसाय डबघाईला आला असून शेतकऱ्यांचा लागवड खर्च सुद्धा निघत नसल्याची खंत स्वतः शेतकरी पुत्र असलेले माजी मंत्री आ.वडेट्टीवार सभागृहापुढे व्यक्त केली. सोबतच आंध्र प्रदेशातून येणाऱ्या बोगस बिटी बियाण्यांमुळे शेतकऱ्यांची प्रचंड फसवणूक होत असताना शासन मात्र केवळ कारवाईचा फार्स दर्शविण्यात व्यस्त असल्याचे ताशेरे यावेळी आ.वडेट्टीवार यांनी प्रशासनावर ओढले. माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांच्या मागणीला साद देत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आग्रही मागणीची भूमिका घेत बोगस बियाण्यांवर करण्यात येणाऱ्या कारवाया या नियोजित खोट्या टोळ्या अस्तित्वात आणून करण्यात येत असून यातून केवळ वसुलीचा सपाटा सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला . यावर राज्याचे नवी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे हेतू लवकरच कडक कायदा आणणार अशी ग्वाही दिली. राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते, शेतकरी पुत्र आ. विजय वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून शेतकऱ्यांच्या हितासाठी पावसाळी अधिवेशनात आक्रमक भूमिका शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी पुढाकार घेऊन सभागृह गाजविले.
शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये