ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

“वंदे मातरम” गीताला १५० वर्ष पूर्ण

चंद्रपूर मनपाच्या २६ शाळांमधील ४ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे सामूहिक गायन

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :– भारताच्या राष्ट्रीय आंदोलनाचे प्रतीक असलेल्या “वंदे मातरम” या अमर देशभक्तिगीताला यंदा १५० वर्ष पूर्ण होत असल्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर चंद्रपूर महानगरपालिकेच्या सर्व २६ शाळांमध्ये सामूहिक गायनाचा विशेष उपक्रम उत्साहात पार पडला.

   या कार्यक्रमात नर्सरी ते माध्यमिक वर्गांपर्यंतच्या ४ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सर्व शाळांमध्ये सकाळी एकाच वेळी “वंदे मातरम” गीताचे गायन करून विद्यार्थ्यांनी देशभक्ती, एकता आणि राष्ट्रीय अभिमानाचा संदेश दिला. विद्यार्थ्यांच्या स्वरात गुंजलेले हे गीत संपूर्ण परिसर देशप्रेमाने भारावून टाकणारे ठरले.

  या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना “वंदे मातरम” गीताचा ऐतिहासिक संदर्भ, त्यामागील राष्ट्रप्रेमाची भावना आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्याचे योगदान समजावून सांगण्यात आले. या गीताची निर्मिती बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी १८७५ मध्ये केली होती, आणि तेव्हापासून ते भारतीय जनमानसात देशभक्तीचे प्रतीक म्हणून रुजले आहे.

  चंद्रपूर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये घेतलेल्या या उपक्रमास विद्यार्थ्यांसह शिक्षक, मनपा अधिकारी व कर्मचारी यांनी उत्साहाने प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने गायन करून देशभक्तीचा उत्कट संदेश दिला. कार्यक्रमादरम्यान शिक्षकांनी गीताचे महत्त्व आणि त्यातून मिळणारे प्रेरणादायी मूल्य यावर थोडक्यात भाष्य केले.

  महानगरपालिकेच्या वतीने या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, सामाजिक एकात्मता व राष्ट्रीय अभिमानाची भावना दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रसंगी सर्व शाळांमध्ये राष्ट्रीय ध्वजाला वंदन करून “एक सूर – एक भावना – भारत माता की जय!” या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची जाणीव आणि सामूहिकतेची भावना निर्माण होणे हीच खरी शिक्षणाची दिशा आहे. अशा उपक्रमांमुळे देशप्रेम आणि राष्ट्रीय ऐक्य दृढ होते.”

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये