चारगावात पुन्हा पट्टेदार वाघाची दहशत
एका आठवड्यात चार बकऱ्या व गाय केली ठार
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
तालुक्यातील चारगाव येथे काही महिन्यापासून बंद असलेली पट्टेदार वाघाची दहशत पुन्हा चालू झाली आहे. एका आठवड्यात गावातील चार बकऱ्या व गाय ठार केल्याने गावकरी भयभीत झाले आहे. चारगाव परिसरात वेंकोलीचे बंद पडलेली खुल्या कोळसा खानी आहे त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात झुडपी जंगल व्यापली आहे त्या झुडपी जंगलाचा आसरा घेऊन पट्टेदार वाघाने आपले वास्तव निर्माण केले आहे. सहा महिन्यापूर्वी त्या पट्टेदार वाघाचा वन विभागांनी बंदोबस्त केला होता मात्र आता पुन्हा सतत हा वाघ गावात येत आहे. या आठवडाभरात आकाश रायपुरे यांचे तीन शेळ्या, गणेश गोवारदिपे यांची चराईसाठी गेलेली शेळी तर मारुती काळे यांची गाय ठार केल्याच्या घटना घडल्या गेल्या दोन दिवसापासून रामदास रायपुरे यांच्या शेतात असलेला गोट फार्म जवळ हा वाघ बसलेल्या स्थितीत आढळत आहे. त्यामुळे गावकऱ्यांना सतत या वाघाचे दर्शन होत असल्याने शेतकऱ्यांचे शेतात जाणे मुश्किल झाले आहे. सध्या शेतीचा हंगाम चालू असल्याने शेतीची कामे बंद अवस्थेत असल्याने शेतकरी व शेतमजूर यांच्यासमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. या वाघाचा चा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. या प्रकाराबाबत क्षेत्र सहाय्यक विकास शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. एक नाही तर तीन पट्टेदार वाघ. चारगावात गेल्या काही दिवसापासून येथील नागरिकांना एकीकडे एक तर दुसरीकडे दुसरा वाघाचे दर्शन नेहमीच होत आहे तर काहींनी चक्क एकत्र तीन वाघ बघितले आहे त्यामुळे या परिसरात तीन पट्टेदार वाघ असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. वनविभाग फटाके लावतात व निघून जातात – गेल्या दोन वर्षापासून वेकोलीच्या बंद खाणीच्या झुडपी जंगलामुळे गावात पट्टेदार वाघाची दहशत आहे या भागात पिंजरे लावून बंदोबस्त करण्याची कित्येकदा लेखी व तोंडी तक्रारी गावकऱ्यांनी केल्या मात्र याकडे वन विभागाने दुर्लक्ष केले आहे गावकऱ्यांनी वाघाची माहिती देताच वन अधिकारी व कर्मचारी येतात फटाके लावतात ढोल ताशे वाजवतात व निघून जातात. पुन्हा वाघाची गावात दहशत चालू असते असा प्रकार सुरू आहे.