…?शपथविधी नसून, शापितविधी आहे! – आर.केदार
ना जनतेचा विचार ना विकास! निव्वळ न्यूज चॅनलवर भांडणाचा तमाशा...
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. चंद्रशेखर प्यारमवार
शापितविधी
दि.२/०७/२०२३ रविवारला माध्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा एकदा भूकंप झाला आणि त्यासोबत राजकारणातील घड्याळांच्या काट्याची दिशा बदलून गेली.गेल्या चार वर्षापासून महाराष्ट्रात अधूनमधून भूकंप येत असतो.यात कधी कुणाचे बाण उध्वस्त होतात तर कुणाचे काटे फिरुन जातात. महाराष्ट्रातील जनतेला मात्र आश्चर्याच्या धक्क्याशिवाय काहीच मिळत नाही. ना जनतेचा विचार ना विकास ! निव्वळ यांच्या भांडणाचा तमाशा रोजच न्यूज चॅनलवर चर्वण करून करून बघायला मिळतो. हे रोजचे तमाशे चालू असताना या तमाशाच्या सूत्रधारांना आता मात्र कोणत्याही विचारधारेचे,धर्माचे, पुरोगामीत्वाचे, धर्मनिरपेक्षतेचे आणि संवेदनशीलतेचे तत्व पाळावे असे काही बंधन नसते.
बाकीचे तत्व बाजूला ठेवा,पण आदल्याच दिवशी घडलेल्या समृद्धी महामार्गावरील मृतांची चिताही विझली नाही. मृतांच्या नातेवाईकांचा हंबर्डाही शांत झाला नाही.एवढे क्रौर्य घडले असताना दुसरीकडे सत्तेतील समर्थकांकडून हार-तुरे, गुलाल, पेढे वाटणे चालू झाले.
मृतकांच्या नातेवाईकांना पैसे जाहीर करून दुःख दूर होत नसते याच कालावधीत एखादा सत्तेतील मोठा मंत्री मेला असता तर खरच तुम्ही हा शपथविधी घेतला असता काय ? याचे उत्तर नाही हेच आहे.याचाच अर्थ सामान्य जनतेचे जीवन कवडीमोलाचेही नाही.
निव्वळ सत्तेसाठी लाचार झालेल्यांनो ! समृद्धी महामार्गावरील अपघातात २५ लोक मृत्यू पावले. या घटनेची थोडी तरी संवेदनशीलता हृदयात ठेवायला पाहिजे होती. सत्तापिपासूंनो का तुमचे हृदय सत्तेसाठी पाषाण झाले आहे ?
विदर्भातील २५ कुटुंबीयांच्या घरात सुतक होते. त्याच सुतकात तुम्ही शपथविधी पार पाडला. आणि तुमचेच मुखिया ‘हे विश्वची माझे घर’ च्या वल्गना मोठमोठ्याने करतात. तेव्हा तुमच्या कुटुंबातील मृत सदस्यांच्या पार्थिवाचे काय? म्हणूनच हा तुमचा शपथविधी नसून, शापितविधी आहे!
__✍️आर.केदार