घुग्घुस-ताडाली मार्गावरील जुन्या लाईनचे खांब काढल्याप्रकरणी चौकशीची मागणी
राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून मुख्य अभियंत्यांना निवेदन

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर – घुग्घुस-ताडाली मार्गावरील जुन्या बंद झालेल्या वीज लाईनवरील लोखंडी खांब अचानकपणे काढून टाकण्यात आले असून, हे खांब कुठे नेण्यात आले याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नसल्याने सदर प्रकरणात गंभीर अनियमिततेचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे घुग्घुस अध्यक्ष दिलीप पिट्टलवार आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय ठाकूर यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे चंद्रपूर येथील मुख्य अभियंता यांना निवेदन सादर केले आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, बोंगले पेट्रोल पंप ते चिंतामणी कॉलेज या मार्गावर दोन्ही बाजूंनी जुन्या लाईनवरील लोखंडी खांब महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अलीकडेच काढले आहेत. मात्र, हे खांब कुठे जमा करण्यात आले, त्याचा उपयोग काय होणार आहे किंवा ते खाजगी घातले गेले आहेत काय, याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे पिट्टलवार व ठाकूर यांनी सांगितले.
या संपूर्ण प्रकरणात अपहार अथवा हलगर्जीपणा झाला असण्याची शक्यता लक्षात घेता, याची तातडीने चौकशी करण्यात यावी आणि दोषी आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
या निवेदनाची प्रत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक (प्रकाशगड, मुंबई) आणि चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक यांनाही पाठवण्यात आली आहे.