ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वेकोली वसाहतीमधील समस्यांचा भडका

नागरीकांमध्ये तीव्र नाराजी

चांदा ब्लास्ट

घुग्घुस (चंद्रपूर) : घुग्घुस येथील वेकोलीच्या सुभाष नगर आणि गांधी नगर वसाहती सध्या गंभीर समस्यांनी ग्रस्त असून, मूलभूत सुविधा नसल्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेसच्या महासचिव पदमा त्रिवेणी यांनी शिष्टमंडळासह वेकोलीच्या सब एरिया व्यवस्थापकांची भेट घेऊन केली.

जुनी झालेली पाईपलाईन, गलिच्छ पाणी – नागरिकांचे आरोग्य धोक्यात

शिष्टमंडळाने यावेळी सांगितले की, कॉलनीतील पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन पूर्णतः मोडकळीस आली असून त्यातून घरामध्ये गलिच्छ व दूषित पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत असून विविध आजारांचा धोका वाढला आहे.

तुटलेल्या नाल्या, रस्त्यांवर सांडपाण्याचा प्रवाह

कॉलनीमधील बहुतांश नाल्या तुटलेल्या असून सांडपाणी थेट रस्त्यावर वाहत आहे. पावसामुळे हेच पाणी पुन्हा घरात शिरत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे घरे व परिसर अस्वच्छ आणि अस्वस्थ झाला आहे.

कचराकुंड्यांची साफसफाई बंद, घंटा गाडीही गायब

वसाहतीतील कचराकुंड्या चार महिन्यांपासून साफ झालेल्या नाहीत. घंटा गाडी बंद असल्यामुळे कचऱ्याचा डोंगर साचला आहे आणि परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

जंगली झुडपांमुळे साप-विंचवांचा धोका

पावसाळ्याची सुरुवात झाल्याने वसाहतीच्या आजूबाजूला वाढलेल्या झुडपांमुळे साप, विंचवांसारख्या जीवांचा धोका वाढला आहे. या झुडपांची तातडीने छाटणी करून परिसर स्वच्छ करण्यात यावा, अशी मागणीही शिष्टमंडळाने केली आहे.

नागरिकांचा सवाल : कोट्यवधींचा खर्च झाला तरी सुविधा का नाहीत?

स्थानिक नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया देत म्हटले की, वेकोलीच्या सिव्हिल विभागाने कॉलनी सुधारणे, बांधकाम, रस्ते, नाल्या आणि कचरा व्यवस्थापनावर लाखो-कोट्यवधी रुपये खर्च केल्याचे दाखवले आहे. तरीदेखील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट का होत आहे? हे सर्व काम केवळ कागदोपत्री आहे का? यावर शंका व्यक्त केली जात आहे.

संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची चौकशी करून खर्च झालेल्या निधीचा ऑडिट करावा, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. प्रत्येक वेळी निवेदन देऊनही दुर्लक्ष केलं जातं, यावेळी तरी ठोस कृती होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

या वेळी महिला जिल्हा सचिव दुर्गा पाटील, ज्येष्ठ नेत्या संध्या मंडल, जोया शेख, लक्ष्मी गोदारी, बोधमा इरला आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये