खरीप हंगामात बियाणे, खते खरेदी करताना शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी – कृषी अधिकारी उमेश शिंदे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
सध्या खरीप हंगामाला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर बी-बियाणे व खतांची खरेदी सुरू आहे. शेतकऱ्यांनी बी-बियाणे व खते हे अधिकृत कृषी केंद्रामधूनच विकत घ्यावी, असे आवाहन सावली येथील कृषी अधिकारी उमेश कुमार शिंदे यांनी केले आहे.
कृषी केंद्रामधून विकत घेत असताना बियाण्याचे नाव, वाणाचे नाव, कंपनीचे नाव, लॉट
नंबर, बियाण्याची किंमत हे नमूद असलेले पक्के बिल घेऊनच बियाण्याची खरेदी करावी. कुठल्याही प्रकारच्या कच्च्या बिलावर बियाणे खरेदी करू नये. घेतलेले पक्के बिल हे शेतकऱ्यांनी सांभाळून ठेवावे, जेणेकरून पुढे जाऊन खते, बियाण्याबाबत काही समस्या उद्भवल्यास आपल्याला कृषी विभागाकडे तक्रार दाखल करता येईल. शेतकऱ्यांनी कुणाच्याही भूलथापांना बळी
पडून गावामध्ये येणाऱ्या अनधिकृत इसमांकडून कुठल्याही प्रकारचे बियाणे, खते खरेदी करू नये. असे बियाणे, खते खरेदी केल्यास आपली फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे असे बियाणे, खते अनधिकृतपणे विकण्याचा कुणी प्रयत्न करीत असल्यास कृषी विभागाला याबाबतची माहिती द्यावी, असे आवाहन सावली येथील कृषी अधिकारी उमेशकुमार शिंदे यांनी केले आहे.