
चांदा ब्लास्ट
महाराष्ट्र शासनाने घरकुल लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. आता घरकुल योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू मोफत, म्हणजेच रॉयल्टीशिवाय, दिली जाणार आहे.
या योजनेनुसार लाभार्थ्यांना फक्त वाळूच्या वाहतुकीचा खर्च स्वतः करावा लागणार आहे. नदी घाटापासून गंतव्य स्थानापर्यंत वाळू पोहोचविण्याची जबाबदारी लाभार्थ्याची असेल.
चंद्रपूर तालुक्यातील 3000 पेक्षा अधिक घरकुल लाभार्थ्यांना सुमारे 7500 ब्रास वाळूचे मोफत वितरण करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, यासाठी लाभार्थ्यांना कोणताही अर्ज करण्याची गरज नाही, तसेच तहसील कार्यालयात येण्याची आवश्यकता देखील नाही.
ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना ग्रामपंचायत सचिवामार्फत घरपोच रॉयल्टी परवाना मिळेल. हा परवाना घेऊन लाभार्थी थेट घाटावर जाऊन वाळू घेऊ शकतात.
या योजनेसाठी तालुका स्तरावर समिती गठित करण्यात आली आहे. समितीचे अध्यक्ष तहसीलदार विजय पवार असून सदस्यांमध्ये मुख्याधिकारी निलेश रांजणकर, वरिष्ठ भूवैज्ञानिक, गटविकास अधिकारी श्रीमती भांगरे, तसेच नायब तहसीलदार जितेंद्र गादेवार (सदस्य सचिव) यांचा समावेश आहे.
या उपक्रमाचा प्रारंभ आज दिनांक. 21 मे 2025 रोजी वढा येथे दुपारी 4 वाजता करण्यात आला. उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार, नायब तहसीलदार जितेंद्र गादेवार, मंडळ अधिकारी सचिन खंडाळे, सुर्वे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा शुभारंभ पार पडला.
गेल्या काही काळात चंद्रपूर तालुक्यातील रेती घाटांचे लिलाव न झाल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातून रेती आणावी लागत होती किंवा अवैध तस्करांकडून रेती खरेदी करण्याशिवाय पर्याय नव्हता. परिणामी घरकुलधारकांना आर्थिक भार सहन करावा लागत होता.
या निर्णयामुळे घरकुलधारकांना मोफत वाळू उपलब्ध होणार असून त्यांच्या आर्थिक ओझ्यात लक्षणीय घट होणार आहे. शासनाच्या या निर्णयाचे घरकुल लाभार्थ्यांकडून स्वागत करण्यात येत आहे.