गडचांदुरच्या सम्यक संबोधी नगरात विहाराचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा आणि बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
महाकारूणीक तथागत गौतम बुद्ध यांच्या यंदा जयंतीदिनी सम्यक संबोधी बहुउद्देशीय संस्था, सम्यक संबोधी नगर (बोरकर) गडचांदूर च्या वतीने बुद्ध विहाराचे उदघाटन, लोकार्पण सोहळा आणि तथागत भगवान बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
यावेळी मूर्तीची प्रतिष्ठापना संघमित्रा बोधी, नागपूर यांच्या हस्ते करण्यात आली. त्यांच्या धम्मदेसनेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर समाज प्रबोधन व धम्म प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व मार्गदर्शक युवा वक्ता अनिकेत दुर्गे हे होते. त्यांनी आपल्या धम्मप्रबोधनपर मार्गदर्शनातून सांगितले की बुद्धां च्या विचारांची आज खऱ्या अर्थाने जगाला गरज आहे बुद्धांचे विचारच खऱ्या अर्थाने जगाला व देशाला अराजक अशांती व युद्धापासून वाचवू शकते.बौद्ध विहार हे धार्मिक व आध्यात्मिक तेचे प्रतीक नसून ते शिक्षणाचे व संस्काराचे केंद्र व्हावे व त्यातून लोकजागृतीचे कार्य व्हावे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा डॉ.हेमचंद दुधगवळी होते त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून तथागत बुद्धांच्या कार्य विचारावर प्रकाश टाकत बुद्धांनी सांगितलेल्या स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, मानवतावादाची आज जगाला खरी गरज आहे. बुद्धांचे तत्वज्ञान बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानात अंतर्भूत केले आहे.
त्यामुळे संविधानाची जर प्रामाणिकपणे अंमलबजावणी केली तर देश महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून सामाजिक कार्यकर्त्या शांताबाई अभंगे आणि प्रा डॉ सोमाजी गोंडाने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून प्रभाकर जगताप,प्रा प्रशांत खैरे,कैलाश म्हैस्के, प्रा सोज्वल ताकसांडे,दशरथ डांगे,रवी ताकसांडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन,प्रास्ताविक व आभारप्रदर्शन राहुल गायकांबळे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता सम्यक संबोधि नगरातील (बोरकर) तरुण युवा कार्यकर्त्यांनी,महिलांनी व नागरिकांनी मोलाचे परिश्रम घेतले.