दुर्गापूरात पर्यावरण संवर्धन प्रबोधन सभा संपन्न
वृक्ष जगेल तरच मनुष्य जगेल ! - प्रा. सुरेश चोपणे, पर्यावरण तज्ञ, चंद्रपूर
चांदा ब्लास्ट
‘निसर्गाच सृष्टिचक्र हे निसर्गातील हवा, पाणी, प्रकाश, माती तसेच वृक्ष वेली, पशु पक्षी, किटक आणि मानव प्राणी या सारख्या अन्य घटकांचे मिळून झाले आहे आणि हे सृष्टिचक्र निसर्गाच्या स्वत:च्या नियमानुसर चालत असते. त्यामुळे निसर्ग नियमांचं पालन करणे हे मानवा व्यतिरिक्त इतरांना शिकविण्याची गरजच पडत नाही. कारण ते निसर्ग नियमाप्रमाणेच वागत असतात. मात्र या जीवनसृष्टीतील मानव हा एकमेव असा प्राणी आहे की आज केवळ स्वत:च्या प्रगतीचा विचार करून, निसर्गातच राहून निसर्गाच्याच विरूध्द त्याने वागण्याची वाटचाल सुरू केली आहे. त्यामुळेच आज निसर्गाच संतुलन बिघडले आहे. वातावरणातील सारख्या औद्योगीक प्रदुषणामुळे, वृक्षतोडीमुळेच अवघी जीवनसृष्टीच धोक्यात आली आहे. आणि याला फक्त जबाबदार आजचा मानवच आहे, इतर सजीव नाहीत. म्हणून आज मानवाने हे लक्षात ठेवले पाहीजे की तो आज बदलला नाही तर इतरांच्या नाशासोबत मानवजातीचाही अंत हा निश्चित होणार आहे. आणि यासाठीच मानवाने वाढते प्रदुषण कमी करून, वृक्षतोड थांबवून अधिक संख्येमध्ये वृक्षरोपणासोबतच वृक्षसंगोपन, वृक्षसंवर्धन, वृक्ष्ामैत्री, वृक्षसानिध्य प्रस्थापित केलं पाहिजे. कारण जंगलांचे क्षेत्र वाढेल, वृक्षांची संख्या वाढेल म्हणजेच वृक्ष जगेल तरच मनुष्य जगेल!” असे सूचक वक्तव्य दुर्गापूर येथे आयोजित “तरूसंगोपन” धम्मउत्सवाप्रित्यर्थ आयोजित पर्यावरण संवर्धन प्रबोधन सभेत पर्यावरण तज्ञ तथा स्कॉय वॉच ग्रुप, चंद्रपूरचे संस्थापक मा. प्रा. सुरेश चोपणे यांनी प्रतीपादीत केले.
धम्मदायाद मेत्ता संघ तथा धम्म प्रसार समिती दुर्गापूरच्या विद्यमाने तरूसंगोपन धम्मउत्सवांतर्गत दुर्गापूरच्या प्रसिध्द संत चंदुबाबाचे मठ सभागृहात सदर प्रबोधन सभा घेण्यात आली. याप्रसंगी मराठा सेवा संघाचे मा. महादेवजी ढुमणेसर दुर्गापूरचे माजी सरपंच मा. शरद मानकर, मायाताई मून व दंत चिकित्सक डॉ. स्नेहा बेंडले, चंद्रपूर यांनीही सभेला उदबोधित केले. प्रबोधन सभेचे प्रास्ताविक संगीता मानकर यांनी केले. सभेचे सुत्र संचालन प्रा. छाया वालदे व आभार प्रदर्शन अनिल वानखेडे यांनी पार पाडले. तरूसंगोपन उत्सवापित्यर्थ मान्यवर अतिथींना ग्रंथभेटीने सन्मानीत करण्यात आले. समारंभाच्या यशस्वीतेसाठी सदाशिव नगराळे, रोमल वालदे, कविता नळे, रीना साखरे, प्रेमा मानकर व अस्मिता वानखेडे यांचे सहकार्य मोलाचे लाभले. सदर सभा गावकऱ्यांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात प्रश्नोत्तराच्या सत्राने पार पडली.
तसेच दि. ३ जुलै २०२३ रोजी आषाढ पूर्णिमेला हर्षल कॉन्व्हेन्ट दुर्गापूर येथे धम्मचक्रप्रवर्तनदिन समारंभ साजरा करण्यात येणार आहे. तेव्हा परिसरातील सर्व जनतेनी यांची नोंद घेऊन बहुसंस्थेने उपस्थित राहण्याचे आयोजकांनी या प्रसंगी आवाहन केले आहे. असे धप्रस प्रवक्ता नरेंद्र रामटेके कळवितात.