ताज्या घडामोडी

महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेत ‘एक फुल तीन माली’

एकाच कामासाठी एकाच वेळी 3 कंत्राटदारांची नियुक्ती करण्याचा घाट घातला

चांदा ब्लास्ट :

चंद्रपूर महानगरपालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांनी मर्जीतील कंत्राटदाराच्या हितासाठी आडमार्गाने  पाणीपुरवठ्याच्या कामाचे खाजगीकरण करण्याचे कट कारस्थान  रचले असल्याचा आरोप (भाजप वगळून) मनपाच्या सर्वपक्षीय माजी नगरसेवकांनी केलेला आहे. भाजपच्या माजी नगरसेवकांनी अजून पर्यंत याबाबत आपली भूमिका जाहीर केलेली नाही.

मात्र इतर सर्वपक्षीय माजी नगरसेवकांनी आज घेतलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये पाणीपुरवठ्याच्या कंत्राटाबाबत खळबळजनक  गौप्यस्फोट केला.

पाणीपुरवठ्याच्या एकाच कामासाठी एकाच वेळी 3 कंत्राट देण्याचा मनपाचा खटाटोप सुरू असल्याचा आरोप माजी  नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केला. यावेळी माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस चे दिपक जयस्वाल, विनोद लभाने,काँग्रेस चे अशोक नागपुरे, बापु अन्सारी, गोपाल अमृतकर,प्रदिप डे,मनोरंजन रॉय, प्रसन्न शिरवार, काँग्रेसच्या नगरसेविका सुनीता अग्रवाल, सकिना अन्सारी,विना खनके,शिवसेनेचे आकाश ऊर्फ पिंटू साखरखर, अपक्ष नगसेवक हनुमान चौखे, उपस्थित होते.

 

या पत्रकार परिषदेमध्ये देशमुख यांनी तीनही निविदेच्या प्रती प्रसिद्धी माध्यमांसमोर जाहीरपणे दाखविल्या. तीन महिन्यात एकाच कामासाठी तीन वेगवेगळ्या निविदा काढून तीन कंत्राटदारांची नेमणूक करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे ‘एक फुल तीन माली’ असा प्रकार असल्याचा आरोप  यावेळी देशमुख यांनी केला.

पाणीपुरवठा योजना चालविण्याकरिता नुकतीच एक निविदा प्रसिद्ध करण्यात आली.या निविदेमध्ये इरई धरन ते तुकुम जलशुद्धीकरण केंद्र ते बाबुपेठ-दाताळा सम्पवेल येथील सर्व यंत्रसामुग्री-उपकरणे चालविणे व त्यांची देखभाल-दुरुस्ती करणे अशा कामांचा स्पष्ट उल्लेख आहे.शहरातील नागरिकांना  पाणीपुरवठा करण्याची संपूर्ण जबाबदारी सदर कंत्राटदाराकडे असल्यामुळे पाईपलाईनची देखभाल-दुरुस्ती, गळतीचे काम सुद्धा त्याच कंत्राटदाराने करणे अपेक्षित आहे.सर्व यंत्रसामुग्री-उपकरणांची विद्युत व यांत्रिकी देखभाल दुरुस्ती करणे सुद्धा अपेक्षित आहे.

 

मात्र चंद्रपूर महानगरपालिकेने एप्रिल 2023 मध्ये पाईपलाईन जोडणी,गळती दुरुस्ती इत्यादीसाठी एक वेगळी निविदा काढलेली असून ती अंतिम टप्प्यात आहे. मे 2023 मध्ये पाणीपुरवठा योजनेतील विद्युत व यांत्रिकीच्या देखभाल दुरुस्ती करिता कंत्राट देण्यासाठी पुन्हा एक निविदा मनपा प्रशासनाने काढली.या दोन्ही निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून कमी दराच्या कंत्राटदारांची निवड सुद्धा झालेली आहे. एकाच कामासाठी तीन कंत्राटदार नेमण्याचा अनोखा विक्रम  मनपा प्रशासन करीत असल्याचा आरोप पत्रकार परिषदेमध्ये देशमुख यांनी केला. मर्जीतल्या कंत्राटदारासाठी ‘काय पण’ हीच मनपा अधिकाऱ्यांची भूमिका असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.

आयुक्त धादांत खोटे बोलत आहेत

मनपाच्या विशेष सभेने कंत्राट रद्द करून पाणीपुरवठा योजना चालविण्याचा निर्णय घेतल्यानंतर मागील तीन वर्ष कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांचे नेमणूक करण्यात येत आहे. परंतु या पद्धतीला बगल देऊन संपूर्ण योजना चालविण्याचे व देखभाल दुरुस्तीचे काम एकाच कंत्राटदाराला देण्याचा हेतू म्हणजे आडमार्गाने पाणीपुरवठा योजनेचे खाजगीकरणच असल्याचा आरोप पुन्हा एकदा सर्वपक्षीय माजी नगरसेवकांनी केला. याबाबत आयुक्त पालीवाल सार्वजनिकरित्या प्रसिद्धी माध्यमांसोबत धांदात खोटे बोलत असल्याची टिपणी माजी नगरसेवकांनी केली.

 

गैरसमज आमचा नाही, आयुक्त बिपिन पालीवाल यांचा झाला, त्यांचे सर्व गैरसमज दूर करू

आयुक्त बिपिन पालीवाल यांनी आंदोलनकर्त्यांचा गैरसमज झाल्याची प्रतिक्रिया दिली होती. गैरसमज आमचा नव्हे तर आयुक्त पालीवाल यांचा झाला असल्याची खोचक टीका देशमुख यांनी पत्रकार परिषद मध्ये केली. ‘सर्वांनाच आपल्या पद्धतीने मॅनेज करता येते’, हा आयुक्त पालीवाल यांचा गैरसमज आहे. आयुक्तांचे असे सर्व प्रकारचे गैरसमज लवकरच दूर करू असा इशारा सुद्धा त्यांनी यावेळी दिला.

 

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये