विद्युत रोहित्राच्या शॉर्टसर्किटने आग लागून लाखोचे नुकसान
राष्ट्रवादीकडून नुकसान भरपाईची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
तालुक्यातील गिरोली बु. येथील शेतकरी सदाशिव कुंडलिक बांडे यांच्या शेतातील बखारीला विद्युत रोहित्राच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागून शेती उपयोगी कृषी साहित्य आगीत जळून खाक झाल्याने अंदाजे चार ते पाच लाखाचे नुकसान झाले आहे. सदर शेतकऱ्याला शासनाकडून तात्काळ आर्थिक नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
देऊळगाव राजा तालुक्यातील मौजे गिरोली बु. येथील शेतकरी सदाशिव कुंडलिक बांडे यांच्याकडे स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी शेती आहे. शेतात शेती उपयोगी साहित्य ठेवण्यासाठी आणि शेतातील काढलेले पीक साठवण्यासाठी टिन पत्राची बखार बांधलेली आहे. शनिवारी दुपारी अचानक विद्युत रोहित्रामध्ये शॉर्टसर्किट होऊन बखारीला आग लागली.या आगीमुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
त्यामध्ये स्प्रिंकलर सेट,अंदाजे पाच क्विंटल कांदा बियाणे, तीन एचपीचे दोन पंप, पेट्रोल पंप, चार्जिंग पंप, पत्रे, केबल, शेततळ्याची पन्नी व इतर शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. अंदाजे चार ते पाच लाखाचे त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान आज राष्ट्रवादी काँग्रेसपार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे, बाजार समितीचे माजी सभापती गजानन पवार, रंगनाथ कोल्हे, महेश देशमुख, प. स. चे माजी सभापती हरीश शेटे, राष्ट्रवादीचे नेते गणेश गुरुकुल, गणेश सवडे, विष्णू रामाने यांनी घडलेल्या घटनेची पाहणी केली. तसेच तहसीलदार यांची भेट घेऊन सदर घटनेचा तात्काळ पंचनामा करून सदर शेतकऱ्याला शासनातर्फे आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी.अशी निवेदनाद्वारे मागणी केली.