ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ज्ञानसूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

     ज्ञानसूर्य, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर एक महान शैक्षणिक विचारवंत होते. त्यांचे शैक्षणिक विचार,आणि शैक्षणिक योगदान महत्त्वपूर्ण आहे.डॉ.बाबासाहेबांची शैक्षणिक कारकीर्द सुध्दा अतिशय भव्य व प्रेरक आहे. त्यांनी शिक्षणासाठी घेतलेले परिश्रम,संपादित केलेल्या अत्युच्च शैक्षणिक पदव्या आणि त्यातून त्यांनी कमावलेली असामान्य व कुशाग्र बुद्धिमत्ता या गोष्टी आजही सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण विषयक दृष्टिकोन खूप प्रगल्भ आणि आधुनिक होते.

ते स्वतः प्रतिकूल परिस्थितीतही खूप शिकले आणि शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही याचा जणू त्यांनी आदर्श घालून दिला.आज भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांचे शैक्षणिक विचार जाणून घेऊया.

        शिक्षणामुळे परिवर्तन होते,हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक विचारांचे सूत्र आहे.समाजाचा विकास करायचा असेल, तर शिक्षणापेक्षा दुसरे मोठे साधन या जगात नाही. स्वातंत्र्य, समता,बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारित समाज घडविण्यासाठी शैक्षणिक क्रांतीची आवश्यकता असल्याची जाणीव सुध्दा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना होती. बाबासाहेबांचे शिक्षण विषयक विचार समजून घेताना त्यांनी दिलेल्या ‘ शिका,संघटित व्हा आणि संघर्ष करा ‘.या संदेशाला विशेष महत्त्व दिले आहे. शिक्षणामुळे गुलामगिरी संपते,आत्मभान येते .अस्तित्व आणि अस्मिता निर्माण होते .यामुळे बाबासाहेबांच्या चळवळीत शिक्षणाला महत्त्व होते. शिक्षणात फक्त करिअरला अर्थ नाही तर संघटित होऊन आपल्या समाजातील मानसिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक गुलामगिरीच्या विरोधात संघर्ष करण्याची प्रेरणा दिली पाहिजे.शिक्षणाशिवाय आपली शक्ती जागृत होणार नाही. आपण स्वतःला ओळखले पाहिजे, आपण कोणत्या पातळीवर आहोत याची जाणीव असली पाहिजे, त्याशिवाय आपल्यातील माणूस जागा होणार नाही. या सर्व बाबीं करता एकच मार्ग आहे तो म्हणजे शिक्षण असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात.

           भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे उच्च विद्या विभूषित होते. “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ,ते जो प्राशन करेल तो गुर गुरल्या शिवाय राहणार नाही “,असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे,कारण त्यांच्या मते शिक्षण घेतल्यामुळे आपल्या ज्ञानात भर पडते,आजूबाजूची व्यवस्था कळते,न्याय व अन्यायाची ओळख होते,कायदा कळतो व न्यायाची चाड निर्माण होते. केवळ बाराखडी शिकवणे म्हणजे शिक्षण नव्हे , तर मुलांची मने सुसंस्कृत करणारे दर्जेदार शिक्षण शाळांनी दिले पाहिजे. इतका सूक्ष्म विचार बाबासाहेबांनी प्राथमिक शिक्षणाबाबत केला होता. प्राथमिक शिक्षणाचा सार्वत्रिक प्रसार सर्वांगीण राष्ट्रीय प्रगतीच्या इमारतीचा पाया आहे. प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत कायद्याने सक्ती करणे अत्यंत गरजेचे आहे,असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वाटत.केवळ लिहिण्या – वाचण्याचे ज्ञान पुरेसे ठरणार नाही ,तर शिक्षणाच्या उच्च टोकापर्यंत पोहचले पाहिजे,म्हणजे त्यांच्या बरोबर वाटचाल करून संपूर्ण समाजाचा दर्जा उंचावेल.आपल्या सर्व सामाजिक दुखण्यावर उच्च शिक्षण हेच एकमेव औषध आहे. बाबासाहेब म्हणतात की, शिक्षकांनी किंवा प्राध्यापकांनी अध्यापन आणि अध्ययन या मध्ये स्वतः ला गुंतवून घ्यावे व सर्व समाजातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करावा.

          बाबासाहेब म्हणत, तुम्ही शिकलात याचा अर्थ सर्व काही घडले असे नाही.शिक्षण महत्त्वाचे आहे यात शंका नाही,परंतु शिक्षणाबरोबरच शील (नैतिकता )देखील सुधारली पाहिजे . नैतिकते शिवाय शिक्षणाचे मूल्य शून्य आहे.

    — *श्री.गोविंद* *भाऊराव* *पेदेवाड* ( *शिक्षक*)

     ( *मो*. *नं* . *9689983533* )

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये