भद्रावती नगरपरिषदेत नागरिकांच्या हक्कासाठी शिवसेनेचा आवाज
नागरिकांच्या मूलभूत समस्यांच्या निवारणासाठी मुकेश जिवतोडे यांनी दिले मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
गेल्या दीड वर्षांपासून भद्रावती नगर परिषद ही प्रशासकाच्या ताब्यात असून, प्रभागांमध्ये कोणतेही लोकप्रतिनिधी नसल्याने नागरिकांची समस्या थेट नगरपरिषद प्रशासनापर्यंत पोहचत नाही. त्यामुळे नागरिक माजी नगरसेवकांकडे तक्रारी घेऊन जात असून, त्यावर तोडगा निघत नाही. याच पार्श्वभूमीवर शिवसेना लोकसभा संघटक मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेला निवेदन देण्यात आले.
शहरात अनेक रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. मुख्य रस्त्यांवर व कॉलनी भागात वीज लाईट बंद असल्यामुळे नागरिकांना रात्रीच्या वेळेस अंधारात प्रवास करावा लागत आहे. अनेक वर्षांपासून सरकारी जमिनीवर राहणाऱ्या नागरिकांना आजतागायत स्थायी पट्टे मिळालेले नाहीत. तसेच स्वच्छतेच्या कामात सातत्य नाही, गटारी व नाल्यांची साफसफाई थांबलेली आहे. ही परिस्थिती पाहता शिवसेनेने थेट प्रशासनाकडे आवाज उठवला आहे.
यावेळी दिलेल्या निवेदनात पुढील मुद्द्यांचा समावेश आहे.
स्थानिकांना पट्टे द्यावेत – २०११ पूर्वीपासून राहत असलेल्या नागरिकांना मालकी हक्काचे पट्टे द्यावेत.
मालमत्ता करात सुलभता – एकरकमी कर भरताना व्याज माफ करून वसुली करावी.
रस्ते आणि लाईटसची दुरुस्ती – विविध भागांतील रस्ते खराब असून लाईट्स बंद आहेत.
स्वच्छता व्यवस्था सुधारणे – नाल्यांची साफसफाई, गटारी उघड्या अवस्थेत.
ट्राफिक सिग्नल व मार्केट यार्ड – नागपूर-चंद्रपूर मार्गावरील सिग्नल, व मांस विक्रेत्यांसाठी स्वतंत्र जागा.
महिला बचत गटांना प्राधान्य – रोजगार निर्मितीसाठी नगरपरिषदेच्या कामांमध्ये सहभागी करणे.
सौंदर्यीकरणाच्या मागण्या – प्रवेशद्वार, चौक व पुतळ्यांच्या ठिकाणी लाईटिंग व सौंदर्यीकरण करणे.
मुख्याधिकारी यांच्याशी थेट चर्चा करताना मुकेश जिवतोडे यांनी सांगितले की, “शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागतो, ही खेदजनक बाब आहे. आम्ही ही लढाई कोणत्याही राजकारणासाठी नव्हे, तर सामान्य माणसाच्या हक्कासाठी लढत आहोत.”
यावेळी माजी उपनगराध्यक्ष प्रफुल चटकी, माजी नगरसेवक सुधीर सातपुते, युवासेना माजी उपजिल्हा प्रमुख महेश जिवतोडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.