ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पिण्याच्या पाण्यासाठी महिला धडकल्या नगरपंचायतीवर!

ऐन उन्हाळयाच्या तोंडावर पाणी टंचाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

सावली नगरपंचायतीची स्थापना होवून जवळपास 13 वर्षाचा कालावधी लोटत आहे. परंतु सावली शहर समस्याग्रस्तच आहे. यामधील सर्वात गंभीर समस्या म्हणजे पिण्याच्या पाण्याची आहे. ऐन उन्हाळयाच्या तोंडावर पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाल्याने सावली नगरातील प्रभाग क्र. 10 व 11 मधील महिला नगरपंचायतीवर धडकल्या.

सावली नगरीकरीता शुध्द पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी माजी विरोधी पक्ष नेते तथा विद्यमान आमदार विजय वडेट्टीवार यांच्या अथक प्रयत्नातुन 12.50 कोटी रुपयाची महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान कार्यक्रम अंतर्गत जीवन प्राधिकरण विभागाकडुन वाढीव पाणी पुरवठा योजना कार्यान्वीत करण्यात आली. परंतु मागील एक वर्षापासुन सदर योजनेद्वारे नळधारकांना पाहिजे त्या प्रमाणात पाणी पुरवठा होत नसल्याची ओरड आहे. मात्र अशा गंभीर बाबीकडे नगरप्रशासनाचे दुर्लक्ष होतांना दिसत आहे. कंत्राटदाराच्या मनमानी कारभारामुळे सदर योजना कुचकामी ठरत असल्याचीही चर्चा ऐकावयास मिळत आहे.

वाढीव पाणी पुरवठा योजनेचे काम हे नियमबाह्रय पध्दतीने झाल्यानेच काही प्रभागात भरपूर पाणी तर काही प्रभागात पाहिजे त्या प्रमाणात पाणी मिळत नसल्याने ऐन उन्हाळयाच्या तोंडावर पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना वणवण भटकण्याची वेळ आलेली आहे. मार्च महिना असल्याने पाणीकराची सक्तीची वसुली सुरु आहे. परंतु पाण्याची समस्या सोडविण्यास नगरपंचायत असमर्थ ठरत असल्याने महिलांना नगरपंचायत गाठुन अनेकदा समस्या निकाली काढण्याची विनंती करावी लागत आहे. ऐन उन्हाळयाच्या तोंडावरच पाणी मिळत नसेल तर भर उन्हाळयात पाणी पेटणार हे मात्र निश्चित. मात्र अशा गंभीर नगरप्रशासन कानाडोळा करीत असल्याने यावर वरिष्ठांनी लक्ष घालुन सावली शहरातील पिण्याच्या पाण्याची समस्या लवकरात लवकर निकाली काढावी अन्यथा तिव्र आंदोनालनाचा ईशाराही महिलांनी दिला. यावेळी प्रभाग क्र. 10 व 11 मधील माधुरी सोनुले, शामलता कावळे, सुवर्णा कावळे, वैशाली निकोडे, पुष्पा सोनुले, जास्वंदा सोनुले, कुंदाबाई सोनुले, माला वाढई, प्रियंका वाढई, ज्योती वाढई, पुष्पा मांदाळे, माधुरी मांदाळे आदी महिला उपस्थित होत्या.

     मागील एक वर्षापासुन पिण्याचे पाणी नियमित मिळत नसल्याने वारंवार नगरपंचायतीला तक्रार देण्यात आली मात्र अजुनपर्यंत समस्या निकाली काढली नाही. त्यामुळे येत्या आठ दिवसात पिण्याच्या पाण्याची समस्या निकाली न काढल्यास नगरपंचायतीवर घागर मोर्चा काढुन न्याय मागण्यात येईल.

                               माधुरी सोनुले, गृहिणी

      शहरात ज्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या आहे त्या निकाली काढण्यास आम्ही प्रयत्नशिल असुन यावर लवकरच तोडगा काढण्यात येईल.

               शिवप्रसाद नागरगोजे, मुख्याधिकारी न.पं सावली

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये