जागतिक तंबाखू विरोधी दिन!
तंबाखू सेवनाच्या दुष्परिणामांची जनजागृती होऊन कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी! - अॅड विनोद बोरसे यांची माहिती

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : संपूर्ण जगभरात दरवर्षी सुमारे पन्नास लाखांहून अधिक तर भारतात सुमारे दहा लाखांहून अधिक लोकांचा तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या दुर्धर आजारांनी मृत्यू होत असतो.महाराष्ट्रात सुमारे अडीच कोटींहून अधिक लोक तंबाखू सेवन करतात.बिडी, सिगारेट, चिलीम आदी तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने लाखो लोक तोंडाच्या कर्करोगाने आजारी आहेत.तंबाखु सेवनाने होणारे गंभीर आजार व मृत्यूमुखी पडणाऱ्यांची आकडेवारी पाहता तंबाखू सेवनाच्या दुष्परिणामांची जनजागृती होऊन कायद्याच्या कठोर अंमलबजावणीची आवश्यकता असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अॅड विनोद बोरसे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.
काय आहे जागतिक तंबाखू विरोधी दिन?
सन १९८७ पासून जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण जगभरात दरवर्षी ३१ मे हा दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो.तंबाखुसेवनाच्या चक्रव्यूहातून तरूणांना बाहेर काढून निकोटिन व तंबाखू सेवनाच्या व्यसनाला प्रतिबंध करणे आवश्यक आहे.त्यामुळे तंबाखू सेवन ही एक जागतिक समस्या असल्याचे घोषित करून या व्यसनातून तरूणपिढीला बाहेर काढण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून प्रबोधन केले जात असल्याचे अॅड विनोद बोरसे यांनी सांगितले.
काय आहे या वर्षाची थीम !
सन २०२५ ची थीम – अनमस्कींग द अपील अशी आहे.अनमस्कींग द अपील म्हणजे तंबाखू आणि निकोटिनशी निगडीत उत्पादक कंपन्यांच्या आकर्षक व फसव्या युक्त्या उघड करणे,त्या डावपेचांचा पर्दाफाश करणे होय.त्यामुळे तंबाखू सेवनाच्या दुष्परिणामांबाबत अधिक जनजागृती करणे गरजेचे आहे असे अॅड विनोद बोरसे यांनी सांगितले.
काय आहेत कायद्यातील तरतुदी?
भारतात सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा दि.१८ मे २००३ पासून अंमलात आलेला आहे.सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थांची जाहिरात, प्रतिबंध, व्यापार, उत्पादन, पुरवठा,वितरण, आदी मुद्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी या कायद्याचा वापर केला जातो.सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणेस बंदी,अठरा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना तंबाखू विकण्यास बंदी, शैक्षणिक संस्थांच्या परिसरात तंबाखू विकण्यास बंदी आदी तरतुदींचा समावेश या कायद्यात असल्याची माहिती अॅड विनोद बोरसे यांनी दिली.
तंबाखू, जर्दा,खर्रा सेवन शरीराला अपायकारक असुन या पदार्थांचे सेवनानंतर सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन अनेक आजार होत असल्याने तंबाखूवर नियंत्रण ठेवण्यासाठी तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामांचा प्रचार करून तंबाखूच्या व्यसनापासून मुक्त होण्याचा संकल्प करण्यासाठी हा दिवस असल्याचे देखील अॅड विनोद बोरसे यांनी सांगितले.