भद्रावतीत शिवसेना ‘ॲक्शन मोड’वर; जनतेच्या प्रश्नांसाठी आक्रमक पवित्रा
वीजपुरवठा, स्मार्ट मीटर, वाहतूक कोंडी आणि अवैध धंद्यांविरोधात प्रशासनाला निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती :- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार भद्रावती तालुका व शहर कार्यकारिणीची घोषणा झाल्यानंतर शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, जनतेच्या विविध प्रश्नांवर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. तालुकाप्रमुख नरेश काळे, शहरप्रमुख बंटी हेमके, शहर संघटक बंडू चटपल्लीवार व शहर समन्वयक विनोद कोळसे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी आंदोलनात्मक भूमिका घेण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
चंद्रपूर जिल्हाप्रमुख भास्कर ताजणे यांच्या मार्गदर्शनाखाली २३ जूनपासून भद्रावती शहरातील विविध नागरी समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात येत आहे. याच अनुषंगाने महावितरणच्या कारभाराबाबतही शिवसेनेने अधिकाऱ्यांना जाब विचारला.
खंडित वीजपुरवठा, स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात आवाज
शहरात वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा तसेच स्मार्ट मीटरच्या सक्तीमुळे नागरिक त्रस्त असल्याचा आरोप शिवसेनेने केला. नागरिकांना वेठीस धरण्याचे प्रकार तातडीने थांबवावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा महावितरण प्रशासनाला देण्यात आला.
बाळासाहेब ठाकरे चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर
भद्रावती शहरातील बाळासाहेब ठाकरे चौकात वाढत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले. चौकातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत ऑगस्टपर्यंत नागरिकांना दिलासा देण्याचे आश्वासन दिल्याचे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी तालुकाप्रमुख नरेश काळे, शहरप्रमुख बंटी हेमके, उपशहरप्रमुख अरविंद खोबरे,पुरुषोत्तम नैताम,गोलू गेडाम,सचिन डुकरे, शिवसैनिक राजू तांगडे, पंकज खोब्रागडे, सतीश सूर्यवंशी, चंद्रभान राऊत, मारोती सिडाम, अशोक वाणी तसेच महिला आघाडीच्या उषा आमटे, नंदाताई कुटेमाटे, जयाताई धुडे, वैशाली मालेकर, लता निखार, मंगला दुर्गे, कुणाली वानखेडे, माधुरी वाघाडे, यामिनी ताठे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. दरम्यान, नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करण्याचा आणि अन्यायाविरोधात आक्रमक भूमिका घेण्याचा निर्धार शिवसेना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.



