76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त “श्रीतेज प्रतिष्ठान गडचांदुर शुभारंभ प्रसंगी गडचांदुर येथे भव्य तिरंगा बाईक रॅली व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन.
गडचांदूर येथे 'श्रीतेज प्रतिष्ठान'चा थाटात शुभारंभ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
प्रजासत्ताकदिनाच्या शुभप्रसंगी गडचांदूर येथे ‘श्रीतेज प्रतिष्ठान’ या सेवाभावी संस्थेचा शुभारंभ मोठ्या थाटात पार पडला. यवतमाळ जिल्ह्यातील खैरगावच्या प्रसिद्ध ‘नीड’ संस्थेचे अध्यक्ष सुनील गोवरदीपे उदघाटक तर, ‘श्रीतेज प्रतिष्ठान’चे संस्थापक अध्यक्ष निलेश ताजने कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. शहरातील अनेक गणमान्य व्यक्ती याप्रसंगी उपस्थित होत्या.
एका सेवाभावी संस्थेला आवश्यक असलेली दृष्टी आणि सहकार्य ‘श्रीतेज प्रतिष्ठान’कडे असल्यामुळे भविष्यात या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक हिताची मोठमोठी कार्ये नक्कीच पार पाडली जातील यात शंकाच नसल्याचे प्रतिपादन उदघाटक सुनील गोवरदीपे यांनी यावेळी केले. ‘श्रीतेज प्रतिष्ठान’ कोणताही भेदभाव न करता जनकल्याणाच्या निर्व्याज हेतूने विविध उपक्रम राबविणार असून समाजाच्या सर्व स्तरातील सेवाभावी लोक संस्थेशी नक्कीच जुडतील, असा विश्वास निलेश ताजने यांनी प्रास्ताविकातून व्यक्त केला.
तिरंगा सन्मान रॅलीने या सोहळ्याला प्रारंभ झाला. या रॅलीत शेकडो सदस्य आणि शहरवासियांनी सहभाग घेतला. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल संस्थेच्या वतीने सौ. प्रज्ञा समीर देवघरे, वर्षातील 365 दिवस सुरू राहणाऱ्या पालडोह शाळेचे मुख्याध्यापक परतेकी सर, मुंबई येथील ग्राफिक्स आणि ऍनिमेशन डिझायनर शीतल काकडे, संस्थेची प्रतिज्ञा लिहिणारे पांचाड आणि श्रीतेज प्रतिष्ठानचा परिचय करून देणाऱ्या चित्रफितीचे लेखन करणारे पत्रकार शंकर तडस यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. याप्रसंगी विविध शाळा व संस्थेच्या वतीने नृत्य व इतर कलात्मक कार्यक्रम सादर केला. त्यात महात्मा गांधी विद्यालय, लाल बहादूर शास्त्री विद्यालय, होली फॅमिली स्कूल, सरस्वती निकेतन, स्व. भाऊराव पाटील चटप आश्रमशाळा, एम जे डान्स अकॅडमी यांच्या चमूचा समावेश होता. कार्यक्रमाचे संचालन श्रीतेज प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष हरिहर खरवडे यांनी केले तर आभारप्रदर्शन महेंद्र मंदे यांनी केले.
हजारो नागरिकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या शिस्तबद्ध समारंभाच्या आयोजनाकरिता श्रीतेज प्रतिष्ठानचे सचिव संतोष मोतेवाड, सदस्य नितेश डोर्लिकर, राकेश गोरे, अजीम बेग,प्रतीक सदनपवार, कुणाल पारखी, सुयोग कोंगरे, अजहर शेख, मयूर पोटदुखे, क्रिष्णा वायकोर, इमरान पाशा, संजय कोंडबत्तुंवार, शाशिकुमार आचार्य,रुपेश रोहणे, सतीश मुसळे, योगेंद्र केवट, शुभम थिपे, विक्की मेडावर आदींनी परिश्रम घेतले.