भंडारा आयुध निर्माणी स्फोटाच्या घटनेनंतर भद्रावतीच्या चांदा आयुध निर्माणीतील कामगारात दहशत
निर्माणीत दररोज केला जात आहे बॉम्बस्फोट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
आयुध निर्माणी भंडारा येथे स्फोट होऊन ८ कर्मचारी मृत्युमुखी पडले तर ५ जण गंभीर जखमी झालेत. या घटनेने येथील आयुध निर्माणी चांदा मधील कामगारात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या आयुध निर्माणीत गेल्या २ महिन्यापासून दररोज सकाळी ९ ते ९.३० वाजताच्या दरम्यान शक्तिशाली बॉम्बस्फोट घडविला जात आहे. ही चांदा आयुध निर्माणी युद्धात वापरले जाणारे स्फोटके तयार करणारी आहे. दररोज केल्या जाणाऱ्या बॉम्बस्फोटाने एखादी दुर्दैवी घटना घडवून जीवितहानी होण्याच्या भीतीने कामगार वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याकडे जिल्हाधिकारी यांनी स्वतः लक्ष घालावे.अशी मागणी या परिसरातून होत आहे.
आयुध निर्माण चांदा मध्ये गेल्या २ महिन्यांपासून दररोज सकाळी ९ ते ९.३० वाजताच्या दरम्यान शक्तिशाली बॉम्ब चे स्फोट परीक्षणाच्या नावाखाली घडविले जाते. या निर्माणीत युद्धात वापरणारे विभिन्न प्रकारचे बॉम्ब, लॅन्ड माईन्स आणि इतर स्फोटकांची निर्मिती केल्या जाते.
ही स्फोटके संवेदनशील असल्याने त्यांना सुरक्षितरित्या हाताळावी लागते. या निर्माणीच्या २.५ किलोमीटर परिघात कोणत्याही प्रकारचे , माईन्सचे उत्खनन करण्यास कायद्याने बंदी आहे असे असताना सुद्धा निर्माणीत नित्य-नेमाने बॉम्ब परीक्षणाच्या नावाखाली स्फोट घडवून आणले जात आहे. दि. २४ जानेवारीला आयुध निर्माणी भंडारा येथे झालेल्या भीषण स्फोटात ८ कामगारांचा जागीच मृत्यू तर ५ कामगार गंभीर जखमी झालेत.
या घटनेची दहशत येथील निर्माणी कामगार आणि त्यांच्या परिवाराने घेतली आहे.आयुध निर्माणीत अशी दुर्दैवी घटना घडून आपल्या पतीचे अगर मुलाचे बरे वाईट होईल तर नाही ना? अशा चिंतेत त्यांच्या अर्धांगिनी, माता व परिवार आहे. आयुध निर्माणीच्या सभोवताल असलेल्या खेडेगावातील ग्रामस्थांना या स्फोटकांचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागातील बहुतेक घरे मातीचे असल्याने घरांना भेगा पडत आहे. याकडे जिल्हाधिकारी यांनी स्वतः लक्ष घालावे अशी मागणी नागरिकांची आहे. याबाबत आयुध निर्माणी प्रशासनाला विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
या स्फोटकांचा प्रभाव आमचे बरांज (मोकासा) गावापर्यंत होतो. स्फोटाने गावातील घरांना हादरे बसून तडे केले आहेत. स्फोटाने घरे पडेल या भीतीने बहुतेक गावकरी या वेळेला घराबाहेर असतात.
मोहन दुधे, बरांज (मोकासा)
खापरी हा भाग नगरपरिषद क्षेत्रात येतो. विशेषतः हा भाग आयुध निर्माणीच्या अगदी जवळ आहे. दररोज होणाऱ्या या स्फोटाने आमच्या भागातील घरांना जबरदस्त हादरे बसतात.त्यामुळे गावातील काहींच्या घरांच्या भिंतींना हादरे बसून तडे गेलेत. यावर संबंधितांनी लक्ष घालून उपाययोजना करावी.
नरेश काळे,खापरी