महानगरपालिका, नगरपरिषद, जिल्हापरिषद निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यासाठी पदयात्रा
चांदा ब्लास्ट
घुग्घुस (चंद्रपुर) : महाराष्ट्रातील आगामी महानगरपालिका, नगरपरिषद, जिल्हापरिषद निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात, या मागणीसाठी घुग्घुस ते चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायदळ मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
गेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी व त्यांच्या मित्रपक्षांना मिळालेल्या अभूतपूर्व विजयामुळे लोकशाहीत पारदर्शकतेच्या प्रश्नावर चर्चा सुरू झाली आहे. विरोधी पक्ष जवळपास नष्ट होण्याच्या स्थितीत पोहोचला, ही बाब लोकशाहीसाठी धोकादायक आहे. मतदारांच्या विश्वासासाठी निवडणुका पारदर्शक असणे आवश्यक आहे. मात्र, सध्याच्या EVM प्रणालीवर अनेक प्रश्नचिन्हे उपस्थित होत आहेत.
इव्हिएम प्रणालीवर संशय
EVM (Electronic Voting Machine) विरोधकांच्या मते, “Electronic Voting Machine” नव्हे तर “Electronic Victory Machine” झाली आहे. देशातील अनेक तज्ज्ञ, वैज्ञानिक, आणि सामान्य नागरिक EVM प्रणालीच्या सुरक्षिततेवर शंका घेत आहेत. जगातील फक्त मोजक्या देशांमध्येच EVM प्रणालीचा वापर होत असून, अनेक देशांनी त्यावर प्रश्न उपस्थित करून बॅलेट पेपर पद्धती पुन्हा सुरू केली आहे.
जनतेचा विरोध आणि सरकारची दडपशाही
निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यासाठी झालेल्या मागण्यांवर सरकारचा विरोध दिसत आहे. मारकडवाडीतील ग्रामस्थांनी स्वतःच्या खर्चातून बॅलेट पद्धतीने निवडणूक घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना पोलिस बळाचा वापर करून अडवले गेले आणि गुन्हे दाखल करण्यात आले. ही घटना लोकशाहीसाठी गंभीर असल्याचे मोर्चाच्या आयोजकांनी सांगितले आहे.
पदयात्रेचे आयोजन
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत होणाऱ्या या पायदळ मोर्चाचे नेतृत्व राजुरेड्डी व अनिल नरुले करत आहेत. माजी विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार, आमदार सुधाकर अडबाले, माजी आमदार सुभाष धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 23 डिसेंबर 2024 रोजी आयोजित या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.