Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

उद्या अनंत चतुर्दशी – श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी मनपा सज्ज

चांदा ब्लास्ट

शहर नियंत्रण समिती अंतर्गत १०० हुन अधिकारी कर्मचारी कार्यरत

प्रियदर्शिनी चौक ते जटपुरा गेट परिसरात दुकाने लावण्यास मनाई

शहरात १७ सप्टेंबर अनंत चतुर्दशी रोजी होणारा श्रीगणेश विसर्जन सोहळा सुरळीत पार पडण्याच्या दृष्टीने चंद्रपूर महानगरपालिकेचे १०० हुन अधिकारी कर्मचारी आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात कार्यरत आहेत. विसर्जनाच्या दिवशी गर्दी नियंत्रणाच्या दृष्टीने प्रियदर्शिनी चौक ते जटपुरा गेट,जिल्हा परिषदेच्या एका बाजुस विसर्जनाच्या दिवशी दुकाने लावण्यास प्रशासनाद्वारे मनाई करण्यात आली आहे.

     विसर्जन सुरळीत होण्याच्या दृष्टीने बांधकाम विभागाद्वारे शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जनासाठी जाण्याचा मार्गांची माहीती घेऊन पावसामुळे निर्माण झालेले खड्डे भरून काढण्यात आले आहेत. मार्गावरील दुभाजकांचे सौंदर्यीकरण करण्यात आले आहे.

विसर्जन मिरवणुकीचा मार्ग तसेच वाहतुक व्यवस्थेची माहिती नागरीकांपर्यंत पोहचविली जात आहे. मिरवणुकी दरम्यान अनुचित घटना घडु नये याकरीता विसर्जन मार्गांवर विविध ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत.

    विद्युत विभागामार्फत सर्व कृत्रिम तलाव, जटपुरा गेट, मुख्य मार्ग, विसर्जन मार्ग, विसर्जन स्थळ तसेच संपूर्ण शहरात आवश्यक त्या ठिकाणी पुरेशी लाईट व्यवस्था तसेच जनरेटरची पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली आहे. आरोग्य विभागामार्फत आरोग्य पथकाच्या चमु वैद्यकीय सेवा देण्यास पूर्ण वेळ विसर्जनस्थळी राहणार असुन गांधी चौक, जटपुरा गेट व विसर्जन स्थळी अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात येत आहे. जटपुरा गेट येथे गणेश मंडळांच्या स्वागतासाठी मंडप व स्टेज उभारणी करण्यात येणार आहे. यांत्रिकी विभागामार्फत वाहन व्यवस्था सांभाळण्यात येत असुन विसर्जन स्थळी लागणारे पिण्याचे पाणी, फिरते शौचालाय कार्यरत ठेवण्यात येणार आहे.

    अग्निशमन विभागामार्फत आपत्ती व्यवस्थापन चमु पुर्ण वेळ तैनात राहणार असुन मोठे सर्च लाईट, फिरे अँड रेस्क्यु व्हेइकल, पावर बोट,लाईफ जॅकेट लाईफ सेव्हींग ट्युब्ज, क्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात २५ कृत्रिम कुंड व १५ निर्माल्य कलश उभारण्यात आले असुन ६१३५ घरघुती मुर्तींचे विसर्जन त्यात केले गेले आहे. मनपाद्वारे केल्या गेलेल्या जनजागृतीने यावर्षीसुद्धा एकही पीओपी मुर्तीचा वापर नागरिकांनी केला नाही.

     स्वच्छता विभागाद्वारे रस्त्यांची नियमित सफाई करण्यात येत असुन रस्त्यावर व विसर्जन स्थळी कचरा जमा राहु नये यादृष्टीने घनकचरा संकलनाचे नियोजन करण्यात आले आहे. कृत्रीम तलावातुन निघणारे पाणी,निर्माल्य यांचे पावित्र्य राखून कम्पोस्टिंगसाठी पाठविले जाते तसेच माती ही बगिच्यात वापरण्यात येईल अथवा मुर्तीकारांना वाटप करण्यात येते. ईरई नदी या मुख्य विसर्जन स्थळाची स्वच्छता दररोज केली जात आहे. विसर्जनानंतर त्याच रात्री सर्व रस्ते स्वच्छ करून सकाळी सर्वांना स्वच्छ रस्त्याचा वापर मनपा स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांनी मिळतो.

      गणेशोत्सवात गणेश मंडळांना लागणाऱ्या विविध परवानग्या या मनपाने सुरु केलेल्या एक खिडकी योजनेद्वारे देण्यात आल्या आहेत. विसर्जन स्थळी गर्दी होऊ नये व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणुन बॅरिकेटिंग लावण्यात आले आहे गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावणाऱ्यांनी मनपाची परवानगी घेऊनच स्टॉल लावावा लागणार असुन त्यांना व्यवस्थेकरिता स्वयंसेवक आणि स्टॉल जवळ पुरेसे डस्टबिन ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

    त्याचप्रमाणे शहरातील घरगुती मूर्तींचे विसर्जन पूर्णपणे घरी अथवा कृत्रिम कुंडातच केले जाणार असुन इरई नदीजवळील विसर्जन कुंडात केवळ मोठ्या सार्वजनिक मूर्तींचे विसर्जन करणाऱ्यांनाच परवानगी असल्याचे मनपाद्वारे स्पष्ट करण्यात येत आहे.गणेशोत्सव प्रसंगी महानगरपालिकेद्वारे ही सर्व कार्ये दरवर्षी पार पाडली जातात. यावर्षीसुद्धा श्री गणेशोत्सव हा शांततेत व आनंदात पार पाडण्यास सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये