Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोंभुर्णा तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी सदैव तत्पर – पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिला विश्वास

देवाडा खूर्द येथे वाल्मिक ऋषी मंदिरासाठी देणार तीन लाखांचा निधी

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच, राजुरा

पोंभुर्णा तालुक्यामध्ये विविध विकासकामे पुर्णत्‍वास आली असून हा तालूका विकासाच्‍या मुख्‍य प्रवाहात आला आहे. त्यामुळे या क्षेत्राचा चेहरामोहरा बदलला आहे. नागरिकांच्‍या मुलभूत गरजांसह शेतकऱ्यांचे प्रश्न, नागरिकांच्या आरोग्‍याचे प्रश्‍न याला प्राधान्‍य देत हा परिसर अधिक विकसीत करण्याच्या दृष्‍टीने प्रयत्न करण्यात येत आहे. पोंभुर्णा तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी मी सदैव तत्पर आहे, अशी ग्वाही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द येथे नेत्र शस्त्रक्रिया तपासणी शिबिराप्रसंगी ते बोलत होते. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा,माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरनुले, प्रदेश महामंत्री अल्का आत्राम, ज्योती बुरांडे, सुलभा पिपरे, प्रकाश देवतळे, राहुल संतोषवार,वर्षा लोणबले,ईश्वर नेताम,हरीश ढवस,ओमदेव पाल,गंगाधर मडावी आदी उपस्थित होते.

ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी देवाडा खूर्द येथे वाल्मिक ऋषी मंदिरासाठी तीन लाखांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा केली. ते म्हणाले, ‘सध्या गणेशोत्सवाचे पर्व आहे. लोकमान्य टिळकांनी जातीपातीच्या बाहेर जाऊन समाजाचा एक विचार असावा, यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरवात केली. देवाडा खुर्द येथे वाल्मिकी समाजाकडून वाल्मीक ऋषी यांच्या मूर्तीचा जिर्णोद्धार व्हावा यासाठी निवेदने प्राप्त झाली. या निवेदनांचा स्वीकार करून वाल्मिकी ऋषींच्या मूर्तीसाठी तीन लाखाचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.’ आरोग्य सेवा हे ईश्वरीय कार्य आहे. वेळीच उपचार केल्यास दृष्टिदोष बरा होऊ शकतो. त्यामुळे येथे उपचारासाठी येणाऱ्या प्रत्येकाची योग्य पद्धतीने नेत्र तपासणी करा असेही ते म्हणाले.

देवाडा खुर्द येथील देवाडा ग्रामपंचायत भवन, तसेच जलसंधारणाची कामे करण्यात येत आहेत. वाल्मिकी ऋषींची मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सौंदर्यीकरण, संताजी जगनाडे महाराज सभागृह होणार आहे. देवाडा खुर्द येथे संत जगनाडे महाराजांच्या सभागृहाला निश्चितच मान्यता देण्यात येणार आहे. तसेच जमिनीच्या पट्ट्याचा विषय असल्यास तुम्ही पाठपुरावा करा. या भागातील नागरीकांच्या पाठीशी मी पूर्ण शक्तीनिशी उभा आहे, असेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.

सांस्कृतिक कार्य विभागाचा मंत्री म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने जे कार्य करण्याचे भाग्य मला लाभले. यामध्ये अफजलखानाच्या कबरीचे अतिक्रमण हटविणे, वाघनखे भारतात परत आणणे, लाल किल्ल्याच्या दरबारात ‘जय भवानी जय शिवाजीचा जयघोष’ करणे, तसेच भारत-पाकिस्तानच्या सीमेवर 12 फूट उंचीचा छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारणे आदी कार्यांचा समावेश आहे. त्यासोबतच, श्रीशैलम येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभे केले. आता रायगडावर दरवर्षी राज्याभिषेक होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव पोडे, मानोरा, विसापूर तसेच पोंभुर्णा येथे शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचे सौभाग्य प्राप्त झाले असून पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द येथेही शिवाजी महाराजांचा पुतळा उत्तम डिझाईनसह उभारण्यात येणार आहे, अशी माहिती ना. श्री. मुनगंटीवार यांनी दिली.

सदुंबरे तीर्थक्षेत्राचा विकास

 ‘संताजी जगनाडे महाराज हे कोण्या एका जातीचे नसून मानवतेचे प्रवर्तक होते. संताजी जगनाडे महाराजांचे डाक तिकीट प्रकाशित करण्याचे भाग्य मला लाभले. संत जगनाडे महाराजांच्या सदुंबरेला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून दिला. सदुंबरे तीर्थक्षेत्राला 150 कोटी पेक्षा जास्त निधी उपलब्ध करून दिला असून सदर तीर्थक्षेत्राचा विकास गतीने होत आहे. याबाबत तैलिक समाजाचे राष्ट्रीय अध्यक्षांनी आभार मानले आहेत, हे मी माझेच भाग्य समजतो, अशी भावना ना. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

आरोग्यसेवा हे ईश्वरीय कार्य असून गोरगरीब व कष्टकऱ्यांची अविरत सेवा करण्याचा संकल्प मी केला आहे. शासनाच्या वतीने गोरगरिब आणि कष्टकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. देशातील 80 कोटी लोकांना मोफत धान्य देण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात केंद्र शासनाचे 6 हजार व राज्य शासनाचे 6 हजार असे एकूण 12 हजार मिळत आहेत. 2 लक्ष 50 हजारांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या महिला तसेच पिवळे व केशरी रेशन कार्डधारक महिलांना त्यांच्या खात्यात 1500 रुपये थेट देण्यात येणार आहेत. जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येत असून शेतकऱ्याच्या धानाला 20 हजार रुपये हेक्टरी बोनस देऊन भात उत्पादक शेतकऱ्याला न्याय देण्याचे कार्य केले.माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेच्या बँक खात्यात 1500 रूपये देण्यात येत आहे.

ना. श्री. मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून ग्रामपंचायत चक हत्तीबोडी येथे विविध विकासकामे गोपालनगरी, ग्रामपंचायत चक हत्तीबोडी येथे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून सिमेंट काँक्रीट रोड, प्रवासी निवारा, स्ट्रीट लाईट पोलची, विद्युत पथदिव्यांची व्यवस्था आदी विकासकामे पूर्णत्वास आली आहेत. संजय गांधी निराधार योजनेचे अर्ज प्रलंबित राहू नये, यासाठी फिरते जनसंपर्क कार्यालय गावोगावी जाणार आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये