पालकमंत्री ना. अशोकजी उईके यांच्या उपस्थितीत अड्याळ टेकडी येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदु गुद्देवार
ब्रम्हपुरी :- परमपूज्य तुकाराम दादा गीताचार्य यांच्या कल्पनेतिल ग्रामगीतेच्या तत्त्वज्ञानानुसार भु- वैकुंठाचा साक्षात प्रयोग श्रीगुरुदेव आत्मानुसंधान भू वैकुंठ अड्याळ टेकडी येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संस्थापित मुख्य संस्था अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम मोझरी द्वारा संचालित श्री गुरूदेव आत्मानुसंधान भू वैकुंठ अड्याळ टेकडी च्या पुढाकाराने व जनतेच्या सहकार्याने वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा ११६ वा जन्मोत्सव ग्रामजयंती उत्साहात साजरा करण्यात आला. पहाटेच्या सामुदायिक ध्यानाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. महाराजांचा जन्मोत्सव अर्थात ग्रामजयंती कार्यक्रमाचे निमित्ताने श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
मेळाव्याचे उद्घाटक म्हणून महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार प्रा. अशोकजी उईके, प्रमुख पाहुणे म्हणून चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा संचालक अ.भा.श्री गु.से.मं. मोझरी मा. कीर्तीकुमार भांगडिया हे उपस्थित होते. मान्यवरांनी गुरुपद गुंफेतील महाराजांच्या पादुका चे दर्शन करून पूजन केले, त्याच प्रमाणे पूज्य तुकाराम दादांच्या महासमधीचे दर्शन करून मौन साधना तळघराची पाहणी केली. नंतर दीप प्रज्वलन आणि “गुरुदेव हमारा प्यारा” या संकल्प गीताचे सामुदायिक गायन करून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. भुवैकुंठ समितीचे अध्यक्ष मोरेश्वर उईके यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण करून अड्याळ टेकडी विषयी सद्यस्थितीतील कायदेशीर बाजू उपस्थित कार्यकर्त्यांना समजवून सांगून टेकडीवर यात्री निवास, पाण्याची टाकी, सौर उर्जा प्रकल्प, स्विमिंग टँक सह व्यायाम शाळा, गोरक्षण इत्यादी सुविधेची आवश्यकता असल्याचे सांगितले व पालकमंत्र्यांनी सदर सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता विनंती केली. अध्यक्षांच्या रास्त मागणीला चिमूर विधान सभा क्षेत्राचे आमदार यांनी भक्कम समर्थन करून संपूर्ण मागण्या पालकमंत्री महोदय पूर्ण करतील असा विश्वास आपल्या मनोगतामधून व्यक्त केला. तर अड्याळ टेकडी व इतर गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्य स्थळाचा विकास करण्यासह राष्ट्रसंतांच्या कार्यावर चित्रपट निर्मिती करण्याकरिता आमदार व पालकमंत्री एकत्रित रित्या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन प्रयत्न करणार म्हणून पालकमंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितले.
याप्रसंगी मान. लक्ष्मणजी गमे सर्वाधिकारी, प्रकाश महाराज वाघ प्रचार प्रमुख मोझरी,उपसर्वधिकरी दामोधर पाटील, सरचिटणीस जनार्दन बोथे,जीवन शिक्षण परीक्षा प्रमुख, पद्माकर ठाकरे यवतमाळ राष्ट्रवादी चे ब्रम्हपुरी विधानसभा अध्यक्ष विनोद नवघडे, दयारामजी कन्नाके माजी पंचायत समिती सभापती, सुरज सयाम गुरुजी, सारंग दाभेकर उपाध्यक्ष भुवैकुंठ समिती यांनी ग्रामजयंती पर्वात आंदोलन करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. ज्याला दोन तीन महिन्याचा तुकारामजी दादांचा सहवास लाभला नाही. त्यांच्या कडून भोंदूगिरी करण्यावर लोकांनी जागृत राहण्याचे सांगून चर्चेचे आव्हान केले, व कागदपत्रे पुरावे पाहून डोळस पानाने गुरुदेवाचे कार्य करण्याची विनंती केली. नामदेव लांजेवार सरपंच अड्याळ इत्यादींनी मनोगत व्यक्त केले. गावागावातून हजारोच्या संख्येने भाविक गुरुदेव भक्तांनी टेकडीवर येऊन कार्यक्रमात सहभाग घेतला होता.
अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम मोझरी द्वारा संचालित भू वैकुंठ समिती कडून अड्याळ टेकडी येथे सर्वच कार्यक्रम नियमित साजरे करण्यात येत असून अड्याळ टेकडी वर या वर्षाला पहिल्यांदाच महाराजांचा जन्मोत्सव ग्रामजयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यापुढे दर वर्षाला महाराजांचा जन्मोत्सव ग्रामजयंती कार्यक्रम महाराजांनी सांगितल्या प्रमाणे एप्रिल महिन्यात गावागावात ग्रामगीता तत्वज्ञानाचे सक्रिय कार्यक्रम राबवून शेवटी 30 एप्रिल ला लोकहिताचे व जनकल्यानाचे विविध कार्यक्रम राबवून ग्रामजयंती चा महोत्सव अड्याळ टेकडी येथे भव्य दिव्य स्वरूपात नियमित साजरा करण्याचे संस्थे कडून घोषित करण्यात आले. मोजा अड्याळ व परिसरातील ग्रामस्थांकडून महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. राष्ट्रवंदना करून कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाला ध्यान साधना तळघर मौनस्थ सुरज सयाम गुरुजी, भू-वैकुंठ अड्याळ टेकडीचे ज्येष्ठ कार्यकर्ते माजी संचालक तुंडलवार गुरुजी, भुते गुरुजी, नामदेवराव ठाकूर, विश्वनाथजी भेंडारकर, रामकृष्णजी उईके, ताणबाजी उंबरकर महिला प्रतिनिधी ज्येष्ठ कार्यकर्त्या श्रीमती भागरथाबाई गजभे यांची उपस्थिती होती.