सावली तालुक्यातील विविध विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मुख्यालयाला खो
मुख्यालयी राहण्याचे आदेश फक्त कागदावरच

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार
सावली तालुक्याच्या ठिकाणी विविध विभातातर्गत अंतर्गत येत असलेल्या शिक्षण विभाग(जी.प./खाजगी),आरोग्य विभाग,पंचायत विभाग,कृषी विभाग,महसूल विभाग,सार्वजनिक बांधकाम विभाग,सिंचाई विभाग,आरोग्य विभाग,विद्युत विभाग असे अनेक विभाग कार्यरत असून असून संबंधित विभागामध्ये शेकडो अधिकारी आणि कर्मचारी सेवारत आहेत परंतु तालुक्यात ९०%कर्मचारी मुख्यालयी राहत नसून चंद्रपूर,मूल,गडचिरोली नागपूर वरून आपल्या नोकरीच्या ठिकाणी येतात.
मागील आठवड्यात सावली तालुक्यातील अनेक भागाला पूर परिस्थितीचा सामना करावा लागला आणि अजूनही ती परिस्थिती काही भागात कायम आहे.आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश असतानाही संबंधित आदेशाला कर्मचाऱ्यांकडून केराची टोपली दिल्या जात आहे.
आरोग्य,शिक्षण,ग्रामपंचायत, आणि तलाठी कार्यालय या विभागाशी ग्रामीण भागातील नागरिकांची (लोकांची) नाळ जुळलेली आहे.त्यात सर्वात महत्वाचा घटक म्हणजे ग्रामीण भागातील लोकांचे आरोग्य सुरक्षित रहावे यासाठी गावपातळीवर प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र स्थापन करण्यात आले ऐन पावसाळ्याच्या दिवसात ग्रामीण भागातील आरोग्य सेवेतील अनेक कर्मचारी मुख्यालयी राहताना दिसत नाहीत.त्याचसोबत जिल्हा परिषद आणि खाजगी शाळेतील कार्यरत शिक्षक वर्गातही मुख्यालयी राहण्याची उदासीनता आढळून येते. आपत्ती व्यवस्थापनात ग्रामसेवक आणि तलाठी यांनी आवर्जून गावात हजर राहण्याचे आदेश असताना त्यांचेवरही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे वरदहस्त असल्याचे बोलले जात आहे.
मुख्यालयी राहत असल्याचे खोटे दाखले घेऊन घरभाडे भत्त्याची उचल करून तालुक्यातील अधिकारी आणि कर्मचारी शासनाची दिशाभूल करीत आहेत.वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे..