निधिअभावी मोदी आवास योजनेचे घरकुल अर्धवट
पावसाळ्यात शोधावा लागतोय निवारा
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा शेखर प्यारमवार
सावली तालुक्यातील इतर मागास संवर्गातील गरजू कुटुंबांना निवारा मिळावा या उद्देशाने केंद्र व राज्य पुरस्कृत मोदी आवास योजना सुरु करण्यात आली. मात्र मागील तीन महिन्यापासून निधी नसल्याने घरकुल अर्धवट स्थितीत आहेत तर काहींनी उसनवारी करून, शेतीची रक्कम त्यात गुंतवल्याने रक्कम कधी मिळणार याकडे लक्ष लक्वून आहेत.
शबरी आवास योजना, रमाई आवास योजना, यशवंतराव चव्हाण आवास योजनेच्या धर्तीवर इतर मागास वर्गातील कुटुंबांना घरकुल देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने मोदी आवास योजना सुरु केली. घरकुल मंजूर झाल्याने लाभार्थ्यांना आनंद झाला. राहते घर काढून मिळालेल्या अग्रीम रक्कमेतून बांधकामाला सुरवात केली. काहींना पहिला हप्ता, तर काहींना दुसरा हप्ता मिळाला. मात्र त्यानंतर या योजनेत निधीच नसल्याने लाभार्थी कार्यालयाचा चकरा मारत आहेत. अनेक घरकुल अर्धवट राहिले आहेत.
पावसाळा सुरु झाला असल्याने या घरकुलधारक कुटुंबांना इतरत्र निवारा शोधण्याची वेळ आली आहे. शेतीच्या हंगामाकरिता ठेवलेला पैसा घरकुल बांधकामात लावल्याने शेती कशी करायची हाही प्रश्न अनेक लाभार्थ्यांना पडला आहे. त्यामुळे शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी मोदी आवास योजनेचे लाभार्थी करीत आहेत.