शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करा
जय विदर्भ पार्टीचे सुदाम राठोड यांची मागणी
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे
जिवती :- तालुक्यात खरीप हंगामासाठी सर्वत्र तयारी सुरू झाली आहे. या हंगामात पेरणीसाठी शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते आणि शेतीसाठी पैशांची गरज भासणार आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना पीक कर्जाची नितांत गरज आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व बँकांनी जून महिन्याच्या अखेरपर्यंत शेतकऱ्यांचे पीक कर्जाचे वाटप करावे, अशी मागणी जय विदर्भ पार्टीच्या वतीने तहसीलदार यांच्याकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे.
जय विदर्भ पार्टी वतीने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात जय विदर्भ पार्टीचे सुदाम राठोड यांनी म्हटले आहे की, २०२४ च्या खरीप हंगामात तालुक्यातील कोणताही इच्छुक व पात्र शेतकरी पिक कर्जापासून वंचित राहू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने आणि सर्व सहकारी आणि राष्ट्रीयकृत बँकांनी काळजी घेण्याची गरज आहे. मागिल अनुभव लक्षात घेता, तालुक्यातील अनेक बँका या शासनाने दिलेल्या लक्षांकाप्रमाणे पिक कर्जाचे शेतकऱ्यांना वाटप न करता वेगवेगळी कारणे देवून टाळाटाळ करतात. त्यामुळे खरिपाचा हंगाम करण्यासाठी शेतकऱ्यांना खासगी सावकारांच्या दारावर उभे राहावे लागत आहे.
सदरचा प्रकार घडू नये यासाठी तालुका प्रशासन आणि बँकांनी पिक कर्ज वेळेत आणि सुलभ प्रक्रीया राबवून तातडीने उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घ्यावा. तसेच याबाबत जिल्हा प्रशासनाने संबंधीत बँकांना सक्तीचे आदेश द्यावेत, अशी मागणी सुदाम राठोड यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.