बहुजन विचार मंच चंद्रपूर द्वारे तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन

चांदा ब्लास्ट
आज आपल्या देशातील राजकीय, सामाजिक आणि आर्थिक अवस्था बिकट होत चालली आहे. सध्या देशात घडणाऱ्या राजकीय व सामाजिक घटनांमुळे केंद्रातील व राज्यातील सरकार लोकशाहीला सुरुंग लावत असल्याची भावना आज सर्वांमध्ये निर्माण झाली आहे. त्याच कारणास्तव आज संविधान वाचविणे ही काळाची गरज झाली आहे. याच उद्देशातून मा. आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या संकल्पनेतून व आयोजनातून बहुजन विचार मंच द्वारा ‘‘लढा विचारांचा, सन्मान संविधानाचा’’ हा संदेश घेऊन दि. 22 फेब्रूवारी ते 24 फेब्रूवारी या दरम्यान चंद्रपूर शहरातील महानगरपालिकेचे पटांगण, गांधी चौक येथे बहुजन विचारांना चालना देणाऱ्या व लोकशाहीला बळकट करणाऱ्या तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या मध्ये दि. 22 फेब्रूवारी 2024 रोजी सांय. 6.30 वा. महात्मा ज्योतिबा फुले लिखित तृतीय रत्न या महानाट्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. या महानाट्यात 35 कलावंत सहभागी होणार असून यात स्थानिक तसेच मुंबईतील नाट्या कलावंतांचा सहभाग असणार आहे. दि. 23 फेब्रुवारी 2024 रोजी सायं. 6.30 वा. शिवराय ते भिमराय या महापुरुषांचा प्रवास सांगणाऱ्या व बहुजनांच्या लढ्याचा वारसा जतन करणाऱ्या मी वादळ वारा या गीतांचा कार्यक्रम लोककलावंत, मराठी चित्रपट सृष्टी व झाडी पट्टीतील गाजलेले नाव असलेल्या श्री. अनिरुध्दजी वनकर व सहकलावंतांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर दि. 24 फेब्रुवारी 2024 रोजी सायं. 6.30 वा. देश विख्यात वक्ते श्री. विश्वंभर चौधरी यांच्या व्याख्यानातून देशातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक परिस्थितीवर प्रकाश टाकणाऱ्या व सध्याच्या राजकीय परिस्थितीचे विश्लेषण करुन लोकशाही टिकवण्यासाठी बहुजनांची कर्तव्ये या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमाचे आयोजीका आमदार प्रतिभाताई धानोरकर असून बहुजन विचार मंचातील विविध सदस्य विविध समाजातील प्रमुख मान्यवर व पदाधिकारी यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम यशस्वी करण्यात येणार आहे.