नुकसानग्रस्त पिकाच्या नुकसान भरपाई साठी चपराळा ग्रामपंचायतचे आमदार धानोरकर तथा तहसीलदारांना निवेदन
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
तीन दिवसांपूर्वी तालुक्यात झालेल्या गारपीट व वादळी पावसामुळे तालुक्यातील चपराळा गावातील रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे गावातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसून ते हवालदिल झाले आहे.
या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी तहसीलदार तथा आमदार प्रतिभाताई धानोरकर यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनाद्वारे चपराळा ग्रामपंचायत तर्फे करण्यात आली आहे. चपराळा ग्रामपंचायतचे उपसरपंच ज्ञानेश्वर श्रीराम यांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील अन्य गावांसह चपराळा गावातही गारपीट व वादळी पावसाने थैमान घातले. या नैसर्गिक आपत्तीत गाव परिसरातील शेतांमधील गहू, हरभरा, ज्वारी, मुग, मिरची तथा भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
आधीच खरिपाचा हंगाम समाधानकारक गेला नाही. त्यात या गारपिटासह आलेल्या वादळाने रब्बी पिक पूर्णपणे उध्वस्त केल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या संकटातून सावरण्यासाठी शासनाने नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून येथील शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाईची मदत करावी अशी मागणी सदर निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन सादर करताना उपसरपंच ज्ञानेश्वर सिडाम, बाळकृष्ण महाकुलकर, दत्तू ताजने, किसन येरगुडे,एकनाथ बोधाने, लक्ष्मण मोडक, महादेव लेडांगे तथा अन्य गावकरी उपस्थित होते.