अवकाळी पावसाने उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या
रेखाताई खेडेकर यांची मागणी ; नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे
तालुक्यात रविवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसासह गारपिटीने द्राक्ष, कापूस, तूर,मिरची, शेडनेट उध्वस्त झाले आहे. तालुक्यातील गोळेगाव, तुळजापूर,गिरोली, निमखेड येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा रेखाताई खेडेकर यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. व झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली.
ऐन हिवाळ्याच्या दिवसात तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. गारपिटीचा रब्बी पिकांसह फळबागांना जोरदार फटका बसला. अनेक गावांमध्ये घरांची पडझड असून शेडनेट चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी अडचणी सापडला आहे.दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा अध्यक्षा माजी आ.सौ. रेखाताई खेडेकर,राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस विनायक भानुसे,सुनील झोरे,तालुका अध्यक्ष राजेश इंगळे, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रमोद घोंगे,ओमप्रकाश भुतेकर, कार्याध्यक्ष जनार्दन मगर,सचिव जहीर पठाण,अजमत खान,विजय खांडेभराड,शंकर वाघमारे, विजय पवार आदींनी गारपिटीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. अवकाळी पावसाचा फटका देऊळगाव राजा तालुक्यातील बहुतांशी सर्वच गावांना बसला आहे. कपाशी, ज्वारी, तूर यासह फळबागांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे. यात तुळजापूर महसूल मंडळात गारपीट झाल्यामुळे द्राक्ष बागेची अतोनात नुकसान झाले आहे. द्राक्ष भागांचे घड मणी गारपिटीमुळे कोसळून पडल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच या भागात शेडनेटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेडनेट घेणाऱ्या शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.
गारपिटीने उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट पंचनामे करून तात्काळ थेट खात्यात आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी सौ रेखाताई खेडेकर यांनी केली. यावेळी झालेल्या नुकसानीची पाहणी करताना तालुका कृषी अधिकारी कच्छवे,तलाठी एस. ए. देशपांडे, ग्रामसेवक एस. एन.नवले मॅडम,बंडू तिडके,कृषी सहाय्यक बाळासाहेब हंडाळ तसेच शेतकरी आणि संबंधित गावचे सरपंच अधिकरी हजर होते.
अन्यथा तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढणार गारपिटीने उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट पंचनामे करून तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात भरीव मदतीची रक्कम जमा करावी.त्यात शेडनेट साठी विशेष बाब म्हणून आर्थिक मदत द्यावी. नुकसान झालेल्या पैकी एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये, अन्यथा तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांना सोबत घेऊन आक्रोश मोर्चा काढू.
राजेश इंगळे – तालुका अध्यक्ष, रा. कॉ. दे .राजा
सौ. खेडेकरांचा कृषिमंत्र्यांना फोन
नुकसानग्रस्त पाहणी दरम्यान सौ खेडेकर यांनी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याशी शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यासंदर्भात चर्चा केली. व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी अशी मागणी केली.