बल्लारपूर पेपर इंडस्ट्री मधिल अपघातग्रस्त कर्मचाऱ्याचा अखेरीस मृत्यु
सुरक्षा अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा - कर्मचाऱ्यांची मागणी
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी
मुन्ना खेडकर बल्लारपूर
14 सप्टेंबर रोजी बल्लारपूर पेपर इंडस्ट्री मधे सकाळ पाळी सुरू असताना दुपारी एकच्या दरम्यान काम करीत असताना दिगंबर महाजन नामक कामगार केमिकल युक्त गरम पाणी असलेल्या चार फूट खोल खड्ड्यात पडला होता. त्याला तात्काळ खाजगी दवाखान्यात चंद्रपूर (पोतदार) दाखल करण्यात आले तेथुन नागपूर ला हलवण्यात आले पण आज दि, 25 रोजी सकाळी त्याचा मृत्यू झाला, अपघातात तो गड्यात पडल्याने कंबर पर्यंत गरम केमिकल (ऍसिड युक्त)पाण्यात भाजला गेला होता.
दिगंबर महाजन च्या मृत्यूची बातमी इतर कर्मचाऱ्यांना कळताच त्यांच्यात प्रचंड रोष निर्माण झाला असुन बिल्ट प्रशासनाच्या अव्यवस्थेमुळे तसेच अधिकारी व कंपनी प्रशासन सुरक्षा नियमांची पायमल्ली करीत असल्याने कामगाराचा जीव गेल्याचा आरोप करून कर्मचाऱ्यांनी सुरक्षा अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
प्राप्त माहितीनुसार बिल्ट कंपनीमध्ये मध्ये सिव्हिल काम सुरू आहे आणि त्या करीता 3×3 चा 4 फूट खोल खड्डा खणल्या गेला मात्र त्याच्या सभोवताल कुठलेही सुरक्षा कवच लावल्या गेले किंवा त्यावर कुठलीही झाकण बसविण्यात आले नव्हते. त्या खड्ड्यात 70° डिग्री केमिकल युक्त गरम पाण्याची साठवण करतात. 14 सप्टेंबर रोजी पाऊस सुरू असल्याने त्या खड्ड्यात पावसाचे पाणी गेल्याने येथिल पाण्याचे तापमान कमी झाले होते अन्यथा दिगंबर महाजन चा जागेवरच मृत्यू झाला असता. वास्तविक बघता धोक्याच्या ठिकाणी काम करत असताना कंपनी प्रशासनाने कर्मचाऱ्यांना सुरक्षा साहित्य पुरविणे गरजेचे असते त्याच बरोबर त्या खड्ड्यावर झाकण बसविणे अत्यावश्यक होते मात्र सुरक्षा अधिकाऱ्यांनी ह्या बाबींकडे सपशेल दुर्लक्ष केल्याने कामगाराचा मृत्यु झाला असा आरोप कामगारांनी केला आहे.