ओबीसींचे राजुरा येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण
राष्ट्रीय ओबीसी महासंघ , ओबीसी संघटना व सर्व जातीय संघटनांचा सहभाग
चांदा ब्लास्ट शहर प्रतिनिधी
आशिष यमनुरवार, राजुरा
राष्ट्रीय ओबीसी महासंघ, ओबीसी व सर्व जातीय संघटना यांनी ओबीसी समुदायाच्या न्याय हक्कांसाठी मागील 14 दिवसापासून आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून राजुरा तालुक्यात तहसील कार्यालय राजुरा समोरील मंडपात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. भूषण फुसे हे या एक दिवसिय लाक्षणिक उपोषण करीता बसले असून त्यांना सर्व ओबीसी बांधवांनी पाठींबा दिला व उपस्थिती दर्शविली.
ओबीसीतुन मराठा समाजाला आरक्षण देण्यात येऊ नये, महाराष्ट्र सरकारने बिहार राज्याच्या धर्तीवर जातनिहाय जनगणना करावी, ओबीसी विद्यार्थ्यांकरिता प्रत्येक जिल्ह्यात मुला मुलींचे स्वतंत्र वसतिगृह व स्वाधार योजना सुरू करण्यात यावी यासह अनेक मागण्याचे निवेदन राजुरा चे तहसिलदार डॉ. ओमप्रकाश गोंड यांच्या मार्फत शासनाला देण्यात आले.
या एक दिवसीय लाक्षणिक उपोषण होणाऱ्या आंदोलन स्थळी राष्ट्रीय ओबीसी महासंघ राजुरा संतोष देरकर, बादल बेले, केशव ठाकरे, केतन जुनघरे, राकेश चिलकुलवार, स्वप्नील पहानपटे, सचिन भोयर, सौरभ मादासवार, संतोष कुलमेथे, मनोज आत्राम, उमेश मारशेट्टीवार, सुजित कावळे, भाऊराव बोबडे, सनी रेड्डी, महेंद्र ठाकूर, संघर्ष गडपेल्ली, प्रदीप येरकला, सुभाष हजारे, धनंजय बोरडे आदींसह मोठया संख्येने ओबीसी समाज बांधव सहभागी झाले होते. तब्बल बारा दिवस रविंद्र टोंगे यांचे चंद्रपूर येथे उपोषण सुरू होते याची दखल शासनाने घेतली नाही आणि आता संपुर्ण जिल्ह्यात ओबीसींचे आंदोलन तीव्र होत असून येणाऱ्या 30 सप्टेंबरला संपूर्ण चंद्रपूर जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.