आज राजुरा उपविभागाचा स्वातंत्र्यदिन – 75 वर्षांपूर्वी आजच झाला भारतात समवेश
मुक्तिदिन समिती करणार सात कर्तृत्ववानांचा 'राजुरा भुषण' ने सन्मान
चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी
आशिष रैच राजुरा
गुलामगिरीच्या जोखडातून 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला मात्र तत्कालीन नेत्यांनी मोहम्मद अली जिन्ना ह्यांनी केलेली देशाच्या फाळणीची मागणी मान्य केल्यामुळे पाकिस्तानची निर्मिती झाली. त्याकाळात भारत देश बऱ्या प्रमाणात विखुरलेला होता. देशात विविध संस्थानिकांचे राज्य होते. ह्या राजांना त्याकाळात कोणत्या देशात सामिल व्हावयाचे आहे ह्याचा निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला होता. दक्षिण भारतात असलेल्या निजामाने त्यावेळी स्वतःला स्वतंत्र राष्ट्र घोषित करण्याचा मनसुबा आखला होता ते शक्य नसल्यास त्याला त्याचे संस्थान पाकिस्तानात विलीन करण्याची इच्छा होती. मात्र असे झाल्यास भविष्यात निर्माण होणाऱ्या अडचणी व धोके लक्षात घेऊन तसेच ह्या संस्थानातील नागरिकांची मानसिकता लक्षात घेऊन अखेरीस तत्कालीन गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेलांनी पोलीस ॲक्शन करून मराठवाडा व तत्कालीन आंध्रप्रदेश निजामाच्या तावडीतून मुक्त करून हा भाग भारताला जोडण्यात आला.
ह्या घटनेला आता 75 वर्ष पुर्ण झाली असुन ह्या संपूर्ण प्रदेशासाठी आजचा दिवस खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यदिन आहे. ह्या मुक्तीसंग्रामात त्या काळी कित्येकांनी आपले बलिदान दिले ह्यात राजुरा उपविभागातील अनेकांचा सहभाग होता. त्यांच्या अथक निरपेक्ष प्रयत्नांनी अखेरीस एकसंध भारताची निर्मिती होण्यास मोठा हातभार लागला आहे. ह्या संग्रमाची तसेच स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या देशभक्तांची स्मृती नविन पिढीच्या लक्षात राहावी ह्यासाठी राजुरा येथे मुक्तीसंग्राम समिती मागील अनेक वर्षांपासून मुक्तीदिन अर्थात स्वातंत्र्यदिन साजरा करत असतो.
राजुरा मुक्तीसंग्राम दिन अमृत महोत्सव समितीने दरवर्षी दिल्या जाणा-या आणि प्रतिष्ठेच्या समजल्या जाणा-या राजुरा भूषण पुरस्काराची घोषणा निवड समितीचे अध्यक्ष प्राचार्य डी.बी.भोंगळे यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी राजुरा मुक्तीदिन अमृत महोत्सव समितीचे सदस्य प्राचार्य संभाजी वारकड, संयोजक अनिल बाळसराफ, सहसंयोजक मिलींद गड्डमवार, प्रा.विशाल मालेकर, विजय मोरे, मोहनदास मेश्राम, पूर्वा देशमुख, वनिता उराडे उपस्थित होते.
हैद्राबाद – राजुरा मुक्ती संग्राम लढ्याला 75 वर्ष पुर्ण झाली असुन 2023 हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. देशाच्या भौगोलिक पुर्णत्वास आकार देणारा हा लढा देशाचा इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहीण्यासारखा आहे. यानिमीत्त दरवर्षी प्रमाणे यावर्षीही १७ २०२३, रोज रविवार ला राजुरा मुक्तीदिन अमृत महोत्सव सोहळ्याचे आयोजन केले आहे. ह्या सोहळ्याला दिल्ली येथिल जेष्ठ पत्रकार विदर्भाचे पुत्र अशोक वानखेडे हे उद्घाटक म्हणून लाभले असून जिल्हाधिकारी विनय गौडा कार्यक्रमाचे विशेष अतिथी असणार आहे. ह्या सोहळ्याचे अध्यक्षस्थान जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा पर्यावरण तज्ज्ञ डॉ. विश्वंभर चौधरी भूषविणार असुन क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे, माजी आ. विठ्ठलराव धोटे, माजी आ. ॲड. वामनराव चटप, माजी आ. सुदर्शन निमकर व माजी आ. ॲड. संजय धोटे प्रमुख पाहुणे म्हणून आपली उपस्थिती दर्शविणार आहे.
यावर्षी राजुरा भूषण सन्मानासाठी सात मान्यवरांची निवड करण्यात आली असुन राजुरा क्षेत्रातील पहिले नेत्र शल्य चिकित्सक डाॅ. भैय्यासाहेब नानाजी कल्लुरवार, भारतीय सेनेचे सेवानिवृत्त सुभेदार व शौर्यचक्र प्राप्त शंकर गणपती मेंगरे, जेष्ठ समीक्षक आणि लेखक प्रा. डाॅ. अनंता सूर, छत्रपती संभाजीनगर येथील उद्योजक दिलीप रमेश बुरडकर, पुणे येथील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार प्रभाकर पांडूरंग पाचपुते, माहेश्वरी समाजातील पहिली उच्चशिक्षित डॉक्टर कु. माधुरी गोपाल झंवर, क्षेत्रातील अल्पसंख्याक समाजाची पहिली सनदी लेखापाल कु. सबा शब्बीर खान पठाण या सात मान्यवरांची निवड करण्यात आली आहे. दिनांक 17 सप्टेंबर रोजी होणा-या समारोहात या सर्वांचा परिवारासह सत्कार करण्यात येणार आहे. या सर्व मान्यवरांचे राजुरा मुक्तीदिन अमृत महोत्सव समितीने अभिनंदन केले आहे.