ताज्या घडामोडी

विशेष न्यायालयाने सुनावला तीन लाचखोर वन कर्मचाऱ्यांना 5 वर्षांचा तुरुंगवास

पाच हजारांच्या लाचेसाठी वैरागडे, गौरशेट्टीवार, डोर्लिकर तुरुंगात

चांदा ब्लास्ट जिल्हा प्रतिनिधी

जितेंद्र चोरडिया, चंद्रपूर

चंद्रपूर 16 सप्टेंबर : चंद्रपूर जिल्ह्यातील एका विशेष न्यायालयाने नागभीड तहसीलच्या तळोधी वन परिक्षेत्र कार्यालयात कार्यरत असलेल्या 3 वन कर्मचाऱ्यांना लाचखोरी प्रकरणात 5 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. हा निर्णय सहायक जिल्हा न्यायाधीश जी. जी. भालचंद्र यांनी दिला.

लाचखोरीच्या आरोपाखाली शिक्षा सुनावण्यात आलेल्या वन कर्मचाऱ्यांमध्ये तळोधी वन परिक्षेत्र कार्यालयात कार्यरत वनपरिक्षेत्रपाल विठोबा उस्तुजी वैरागडे, यशवंत त्रिंबक गौरशेट्टीवार, जितेंद्र रमेश डोर्लीकर यांचा समावेश आहे. तिन्ही आरोपींना न्यायालयाने ५ वर्षे कारावास, प्रत्येकी ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ३ महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

वरील तिघांविरुद्ध 18 नोव्हेंबर 2015 रोजी एका ठेकेदाराकडून लाच घेतल्याच्या आरोपावरून नागभीड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या तिघांवरही योगेंद्र मधुकर बनसोड नावाच्या कंत्राटदाराने मुरूम, गिट्टी व बोल्डर उत्खननासाठी नागभिड तालुक्यातील वाढोना येथे महसुल विभागाकडून भाडेतत्त्वावर घेतलेल्या जमिनीतून उत्खनन करण्यासाठी कंत्राटदाराला ५ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. ह्या संदर्भात नागभिड पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती त्यावरून पोलिसांनी सखोल चौकशी करून आरोपींवर दोषारोपपत्र दाखल केले होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये