ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घुग्घुसमध्ये अवजड वाहनांवर नियंत्रणाचा अभाव

अपघातांच्या संख्येत वाढ

चांदा ब्लास्ट

घुग्घुस (चंद्रपूर) : शहर व परिसरात अवजड वाहनांची अनियंत्रित वाहतूक ही गंभीर समस्या बनली आहे. संबंधित विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे, परिणामी अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

शहरातील मुख्य रस्त्यांवर बेशिस्तपणे उभे असलेले अवजड वाहन, वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून मनमानी युटर्न घेणारे ट्रक तसेच पेट्रोल-डिझेल पंपासमोर उभे राहणारे वाहन हे अपघातांना निमंत्रण देत आहेत. सर्वसामान्य नागरिकांसाठी ही परिस्थिती धोकादायक ठरत आहे.

आज शुक्रवार, १६ मे २०२५ रोजी सकाळी सुमारे १०:३० वाजता चंद्रपूर-घुग्घुस मार्गावर घुग्घुस नगरपरिषद कार्यालयाजवळील इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोर अशाच एका घटनेत एक वृद्ध सायकलस्वार मजूर अवजड वाहनाच्या चाकाखाली आला. सुदैवाने त्याला किरकोळ दुखापत झाली असून प्राथमिक उपचारानंतर तो घरी परतला.

उल्लेखनीय बाब म्हणजे, हेच ठिकाण यापूर्वीही अनेक अपघातांचे साक्षीदार राहिले आहे. काही वर्षांपूर्वी याच ठिकाणी एका अल्पवयीन मुलीचा अवजड वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला होता. त्यानंतरही अनेक लहानमोठ्या घटना या मार्गावर घडल्या आहेत, मात्र अद्यापपर्यंत प्रशासनाच्या वतीने ठोस पावले उचलली गेलेली नाहीत.

स्थानिक नागरिकांमध्ये चर्चा आहे की, प्रशासन एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का? विभागीय अधिकारी केव्हा जागे होणार? एखाद्याचा बळी गेल्यावरच उपाययोजना केल्या जाणार का? अधिकारी आपल्या जबाबदाऱ्या झटकत आहेत का, असा सवालही उपस्थित केला जात आहे.

जनतेकडून विचारले जात आहे की, अवजड वाहनांवर नियंत्रण कधी आणले जाणार? संबंधित विभाग रस्ते सुरक्षेचे नियम अमलात आणण्यासाठी किती गंभीर आहे, की अपघात होत राहू द्यायचे असा यांचा विचार आहे?

प्रशासनाने वेळेवर जागे होणे आवश्यक आहे. तात्काळ कठोर पावले उचलून अशा वाहनांवर नियंत्रण ठेवावे, जेणेकरून भविष्यातील अपघात टाळता येतील आणि सामान्य नागरिक सुरक्षित राहू शकतील.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये