पिकांना पाणी देण्यासाठी दिवसा वीजपुरवठा करा
अन्यथा महावितरण कार्यालयात 'मुक्काम' आंदोलन करू - राष्ट्रवादीचा इशारा
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे
शेतकऱ्यांकडून सध्या पिकांना पाणी देण्याची लगबग सुरू आहे. शेतीला पाणी देण्यासाठी दिवसा वीजपुरवठा केल्या जात नसल्याने शेतकऱ्यांना स्वतःचा जीव धोक्यात घालून रात्रीच्या वेळी जागरण करून पिकांना पाणी द्यावे लागत असल्याने शेतकरी हैराण झाले आहे. त्यामुळे पिकांना पाणी देण्यासाठी विद्युतपंपाला दिवसा किमान आठ तास अखंडित वीज पुरवठा करा.
अन्यथा महावितरण कार्यालयात शेतकऱ्यांना सोबत घेऊन मुक्काम आंदोलन करू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महावितरण चे उपकार्यकारी अभियंता संदीप शेटे यांना देण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपकार्यकारी अभियंत्यास घेराव घालून निवेदन दिले.सदर निवेदनात नमूद आहे की,तालुक्यात रब्बी पिकाची पेरणी पूर्ण झाली असून सिंचनाचे काम सुरू आहे.शेतकरी यासाठी दिवसभर शेतात काम करीत आहे.शेतीला दिवसा वीजपुरवठा होत नसल्याने गहू,हरभरा,मका या शेती पिकांना जगविण्यासाठी शेतकरी जीव धोक्यात घालून पिकांना रात्री पाणी देत आहे. शेतकऱ्यांना रात्रभर शेतात उभे राहावे लागत असून त्यात थंडीचा कडाका वाढत आहे. एकीकडे शेतपीके जगविण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे रात्री सरपटणाऱ्या वन्य प्राण्यांचा धोका शेतकऱ्यांना पत्करावा लागत आहे.
अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देताना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यातच वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर रोहीत्रांवर अनेक तांत्रिक बिघाडी होत असतात. ते दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांना रात्री धावपळ करावी लागते. शेतकऱ्यांनी दिवसभर राबराब राबायचे अन रात्री शेतात पाणी देण्यासाठी जागरण करायचे. अशा जीव घेण्या संकटात शेतकरी सापडला आहे.
यासाठी महावितरणाने शेतकऱ्यांना दिवसा किमान आठ तास अखंडित वीज पुरवठा करावा. अन्यथा महावितरणाच्या कार्यालयात शेतकऱ्यांना सोबत घेऊन रात्री मुक्काम आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे,जहीर पठाण,जनार्धन मगर,आजमत खान, विजय खांडेभराड,शंकर वाघमारे,राजु गव्हाणे,रावसाहेब गाडवे,अनिश शाह, असलम खान,इम्रान कुरेशी,मुबारक चाऊस,असलम खान,साजिद खान,शे.सोहेल आदींनी दिला आहे.