सहकार क्षेत्रातून महिलांना आत्मनिर्भर करा : आ. धानोरकर

चांदा ब्लास्ट
बाबुपेठ सारख्या भागात महिलांना सावकारासमोर आर्थिक मदतीसाठी हात पसरावे लागत होते. परंतु हे चित्र बदलण्याची किमया खऱ्या अर्थाने रणरागिणी महिला सहकारी पतसंस्थेने केली असून सहकार क्षेत्रातून महिलांना आत्मनिर्भर करण्याची चळवळ सुरु केली असल्याचे मत आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी व्यक्त केले.
आज रणरागिणी महिला सहकारी पतसंस्थेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्य त्या बोलत होत्या.याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष रितेश तिवारी,मनपा प्रशासकीय अधिकारी शिक्षणं विभाग नागेश नीत, राज्यपुरस्कार प्राप्त प्राचार्य नरेंद्र बोबडे, रणरागिणी महिला सहकारी पतसंस्था अध्यक्षा चंदाताई वैरागडे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना आमदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या कि, छोट्याशा बचत गटाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची उलाढाल करून आर्थिक उन्नती करीत आज या बचत गटाचे रूपांतर महिला सहकारी पतसंस्थेत होत आहे. भविष्यात रणरागिनी महिला सहकारी पतसंस्था गरुड झेप घेईल. ही कौतुकास्पद वाटचाल असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. त्यासोबतच महिला बचतगटाच्या माध्यमातून महिलांचा विश्वास संपादन करून त्यांना आर्थिक उन्नतीसाठी जो प्रयत्न झाला, तो भविष्यातही कायम राहावा, अशी अपेक्षा व्यक्त करीत आमदार प्रतिभा धानोरकर यांनी पतसंस्थेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी अन्य मान्यवरांनी देखील आपली मते व्यक्त केलीत.