हिरापूर-राजोली चक-बेलगाव रस्त्याची दुरवस्था
संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन रस्त्याच्या पुनर्बांधणीचे काम तातडीने हाती घ्यावे
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.शेखर प्यारमवार
सावली तालुक्याच्या ग्रामीण भागातील हिरापूर-राजोली चक-बेलगाव रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी मोठे खड्डे, अनेक ठिकाणी पाणी साचल्याने व रस्त्याचा वापर करणाऱ्या प्रवाशांना अडचण निर्माण झाली आहे.
हिरापूर-राजोली चक-बेलगाव रस्ता हा सावली तालुक्यातील ८ किलोमीटर लांबीचा ग्रामीण जोड रस्ता आहे.रस्ता झाडीझुडपांच्या जंगलातून जातो.१० वर्षांपूर्वी या रस्त्याची एकदाच दुरुस्ती करण्यात आली होती.तेव्हापासून शासन व सार्वजनिक बांधकाम विभागाला या रस्त्याच्या अस्तित्वाचा विसर पडला आहे. वर्षभर हा रस्ता जवळपासचे गावकरी, शेतकरी आणि विद्यार्थी वापरतात.रस्त्याच्या दुतर्फा मोठमोठी झुडपे वाढलेली असल्याने या रस्त्यावर वन्य प्राण्यांच्या हल्ल्याची भीती नेहमीच असते.रस्त्याच्या सद्यस्थितीला नवेगाव येथे असलेली एक स्टोन क्रशर कंपनी आणि त्याचे मोठे ट्रक अधिक जबाबदार आहेत,अशी ग्रामस्थांची तक्रार आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत अनेकवेळा तक्रारी करण्यात आल्या आहेत.मात्र शासन व जिल्हा प्रशासनाने त्याकडे लक्ष दिले नाही. दुचाकीस्वार, चारचाकी वाहनचालक, सायकलस्वार विद्यार्थी व शेतकरी यांना या रस्त्यावरून ये-जा करताना दररोज अडचणींचा सामना करावा लागतो. याकडे आता संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन रस्त्याच्या पुनर्बांधणीचे काम तातडीने हाती घ्यावे, अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत.