प्रांतिक तैलिक महासभेच्या महिला जिल्हाध्यक्षपदी पत्रकार सुषमा राऊत यांची चौथ्यादा निवड
युवा आघाडीची धुरा तानाजी पैठणे यांच्याकडे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या बुलढाणा जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत महिला आघाडी व युवा आघाडीच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा जिल्हाध्यक्ष सुभाष देव्हडे यांनी नुकतीच केली. महिला जिल्हाध्यक्षपदी पत्रकार सुषमा राऊत यांची सलग चौथ्यांदा निवड करण्यात आली असून, युवा आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी तानाजी रामदास पैठणे यांची निवड करण्यात आली आहे. महिला जिल्हा उपाध्यक्षपदी अश्विनीताई क्षिरसागर यांची निवड जाहीर करण्यात आली.
बुलढाणा जिल्हा महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेची बैठक नुकतीच पार पडली. संघटनेचा विस्तार वाढविण्यासोबतच महिला व युवकांना संघटनेच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे जोडण्यासाठी महिला आघाडी आणि युवा आघाडीची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
महिला जिल्हाध्यक्षपदी चौथ्यांदा निवड झालेल्या सुषमा राऊत यांनी गेल्या अनेक वर्षांपासून महिला जिल्हाध्यक्षपदाची धुरा समर्थपणे सांभाळली आहे. त्यांच्या पुढाकारातून शेगाव येथे राज्यस्तरीय वधू-वर मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याच्या माध्यमातून अनेक रेशीमगाठी जुळल्या. तसेच बुलढाणा जिल्ह्यातील विविध गावांना भेटी देऊन त्यांनी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेची भूमिका समाजबांधवांसमोर मांडली असून, तेली समाजाला एका छताखाली आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत.
सुषमा राऊत यांनी नुकतेच वकिली व्यवसायातही पदार्पण केले आहे. उच्चशिक्षित असून प्रबोधन करण्याची प्रभावी हातोटी आणि सामाजिक प्रश्नांची जाण असल्याने त्यांनी समाजात आपला नावलौकिक निर्माण केला आहे. तसेच देऊळगाव राजा तालुका प्रतिनिधी म्हणून त्या गेल्या अनेक वर्षांपासून दैनिक देशोन्नतीमध्ये निर्भीडपणे पत्रकारिता करीत आहेत. त्यांच्या महिला जिल्हाध्यक्षपदी चौथ्यांदा झालेल्या निवडीमुळे संघटनेच्या महिला आघाडीला अधिक बळ मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
महिला जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झालेल्या अश्विनीताई क्षिरसागर यांचे वक्तृत्व प्रगल्भ असून, महिलांना संघटित करण्यासाठी त्यांच्या अनुभवाचा आणि कार्याचा संघटनेला लाभ होणार आहे.
दरम्यान, युवा आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी बुलढाणा तालुक्यातील कोलवड येथील धडाडीचे कार्यकर्ते तानाजी रामदास पैठणे यांची निवड करण्यात आली. युवकांना संघटनेशी जोडण्यासोबतच समाजाच्या विविध प्रश्नांवर युवकांची प्रभावी भूमिका निर्माण करण्याची जबाबदारी आता त्यांच्या खांद्यावर आली आहे.



