अनेक वर्षांनंतर शांतिनगरच्या विकासाचा मार्ग मोकळा
मात्र जमीन पट्ट्यांचा प्रश्न अद्याप कायम!

चांदा ब्लास्ट
घुग्घूस, चंद्रपूर : घुग्घूस शहरातील शांतिनगर परिसरातील गेल्या सुमारे ३० ते ३२ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विकासकामांबाबत आता आशेचा नवा किरण दिसू लागला आहे. लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनी आणि शांतिनगरमधील नागरिक यांच्यात झालेल्या बैठकीनंतर कंपनीने रस्ते, भूमिगत नाली, पथदिवे, शुद्ध पेयजल, मुलांसाठी खेळाचे मैदान तसेच सार्वजनिक शौचालय यांसह विविध विकासकामांबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. कंपनीच्या वतीने ११ ऑगस्ट २०२६ रोजी लेखी स्वरूपात आपली भूमिका मांडण्यात आली आहे.
१९९६ मध्ये जुन्या शांतिनगरमधून झाले होते विस्थापन
स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, लॉयड्स मेटल कंपनीची स्थापना होत असताना सध्याच्या कंपनी परिसराच्या ठिकाणी शांतिनगरची जुनी वस्ती अस्तित्वात होती. सन १९९६ मध्ये कंपनीचे अधिकारी माथुर यांच्या पुढाकाराने या वस्तीतील नागरिकांना सध्याच्या शांतिनगर परिसरात स्थलांतरित करण्यात आले. त्यानंतर जवळपास तीन दशके उलटली, मात्र वस्तीच्या विकासाचा प्रश्न कायम राहिला.
विकासकामांच्या मागणीसाठी नागरिकांनी अनेकदा आंदोलने केली तसेच शासन आणि कंपनीचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस पक्षाच्या चंद्रपूर जिल्हा महिला उपाध्यक्षा यास्मिन सय्यद यांच्यासह स्थानिक नागरिकांनीही हा प्रश्न सातत्याने लावून धरला.
राजू रेड्डी यांच्या मध्यस्थीने सहमतीचा मार्ग
शांतिनगरच्या समस्यांबाबत काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा घुग्घूस नगरपरिषदेचे उपाध्यक्ष राजू रेड्डी यांनी कंपनी व्यवस्थापन आणि नागरिकांमध्ये मध्यस्थी केली. चर्चेनंतर कंपनीने शांतिनगरच्या विकासाबाबत सकारात्मक भूमिका घेतली.
कंपनीच्या लेखी पत्रानुसार, विद्यमान सिमेंट-काँक्रीट रस्त्यांची आवश्यकतेनुसार दुरुस्ती, नवीन रस्त्यांची निर्मिती, भूमिगत ड्रेनेज व्यवस्था, पथदिवे, आरओ वॉटर युनिट, मुलांसाठी खेळाचे मैदान तसेच सार्वजनिक शौचालय यांसारख्या सुविधांवर काम करण्यास कंपनीने सहमती दर्शविली आहे.
ही विकासकामे उपलब्ध जमीन, तांत्रिक व्यवहार्यता, आवश्यक परवानग्या तसेच इतर संबंधित बाबींचा विचार करून टप्प्याटप्प्याने करण्यात येतील, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.
रस्त्याच्या प्रश्नावरही होता वाद
शांतिनगरकडे जाणाऱ्या जुन्या मुख्य मार्गावरूनही वाद निर्माण झाला होता. भविष्यातील विकासकामांसाठी कंपनीने काही जमीन आरक्षित ठेवल्यामुळे मुख्य रस्ता बंद करून नागरिकांसाठी बाजूने पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला होता.
स्थानिक पातळीवर काही नागरिकांनी या पर्यायी मार्गाला विरोध केला. मात्र बहुतांश नागरिकांनी विकासकामांना प्राधान्य देत रस्त्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्याची मागणी केली. त्यानंतर यास्मिन सय्यद आणि राजू रेड्डी यांच्या मध्यस्थीने कंपनी अधिकारी व नागरिकांमध्ये चर्चा झाली आणि विकासकामांचा मार्ग मोकळा करण्याच्या दिशेने सहमती निर्माण झाली.
५२ भूखंडधारकांचा प्रश्न; आता जमिनीचा हक्कदार कोण?
शांतिनगरच्या विकासकामांसोबतच जमीन पट्ट्यांचा प्रश्न सर्वाधिक महत्त्वाचा ठरत आहे.
स्थानिक माहितीनुसार, सुमारे ३० ते ३२ वर्षांपूर्वी जुन्या शांतिनगरमधील ५२ नागरिकांना कंपनीकडून नवीन शांतिनगरमध्ये भूखंड देण्यात आले होते. मात्र या भूखंडधारकांपैकी कोणालाही आजपर्यंत अधिकृत जमीनपट्टा मिळालेला नाही.
सध्या सुमारे २२ जण जमीनपट्ट्याचे हक्कदार म्हणून समोर येत आहेत, तर सुमारे २५ जण काँग्रेसचे राजू रेड्डी यांच्या संपर्कात आले आहेत. कालांतराने काही नागरिक वैयक्तिक कारणांमुळे परिसर सोडून गेले, काहींचे निधन झाले, तर काहींनी आपले भूखंड विकून इतरत्र स्थलांतर केले.
त्यामुळे मूळ ५२ भूखंडधारकांपैकी सध्या कोण पात्र आहे, मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांचे काय होणार, भूखंड विकून गेलेल्या व्यक्तींच्या प्रकरणांचा कसा निपटारा होणार आणि सध्या त्या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या कुटुंबांना जमिनीचा अधिकार कोणत्या आधारावर मिळणार, हे प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत.
विकासाची सुरुवात; मात्र खरी परीक्षा जमीन हक्काची शांतिनगरमध्ये रस्ते, नाली, पाणी, वीज आणि इतर मूलभूत सुविधांचा मार्ग मोकळा होणे ही निश्चितच नागरिकांसाठी दिलासादायक बाब आहे. मात्र तीन दशकांहून अधिक काळ प्रलंबित असलेला जमीन मालकी हक्क आणि जमीनपट्ट्यांचा प्रश्न त्याहूनही मोठा आहे.
कंपनीने आपल्या पत्रात टाउनशिपशी संबंधित जमिनीच्या मालकी हक्काबाबत नागरिकांच्या हिताचा विचार करून सकारात्मक भूमिका घेण्यासह आवश्यक कार्यवाही करण्याचे संकेत दिले आहेत. आता या सकारात्मक भूमिकेचा प्रत्यक्ष लाभ शांतिनगरमधील पात्र कुटुंबांना केव्हा आणि कोणत्या स्वरूपात मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पत्रकार परिषदेत मान्यवरांची उपस्थिती
यावेळी घुग्घूस नगरपरिषदेचे उपाध्यक्ष राजू रेड्डी, काँग्रेस पक्षाच्या चंद्रपूर जिल्हा महिला उपाध्यक्षा यास्मिन सय्यद, नगरसेविका पल्लवी घुले, नगरसेविका सुनीता पेंदोर, नगरसेविका आशा पानघाटे, नगरसेवक दिलीप पिट्टलवार, अनवर सय्यद, कलीम शेख यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते.
आता शांतिनगरसमोर सर्वात मोठा प्रश्न हा आहे—विकासकामांना सुरुवात झाल्यानंतर ३० वर्षांपासून प्रलंबित असलेला जमीनपट्ट्यांचा प्रश्नही पूर्णपणे सुटणार का?



