कृषी महाविद्यालय खिर्डीच्या वतीने खिर्डी येथे वृक्षारोपण व ग्रामस्वच्छता अभियान
प्रभातफेरीतून पर्यावरण व स्वच्छतेचा संदेश ; सार्वजनिक ठिकाणी विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गडचांदूर :- राज्य शासनाच्या हरित आणि स्वच्छ गाव अभियान अंतर्गत कृषी महाविद्यालय, खिर्डीच्या विद्यार्थ्यांनी मौजा खिर्डी येथे पर्यावरण संवर्धन व ग्रामस्वच्छतेचा आदर्श उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. विद्यार्थ्यांनी उत्साहाने वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम आणि जनजागृती अभियान राबवत ग्रामस्थांना स्वच्छ व हरित गावाच्या संकल्पनेशी जोडले.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या प्रभातफेरीने झाली. स्वच्छता हीच देवता आणि “एक घर – पाच झाडे” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. प्रभातफेरीदरम्यान ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्त्व, पर्यावरण संरक्षण तसेच वृक्षसंवर्धनाचा संदेश देण्यात आला. यानंतर ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा, मंदिर परिसर आणि गावातील मुख्य रस्त्यांची सामूहिक स्वच्छता करण्यात आली. तसेच ओला व सुका कचरा वेगळा करण्याचे महत्त्व, प्लास्टिकमुक्त गावाची संकल्पना आणि स्वच्छ परिसर राखण्याबाबत विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून जनजागृती केली.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात वर्धा नदीच्या काठावर, शाळेच्या आवारात तसेच विविध सार्वजनिक ठिकाणी कडुनिंब, आवळा, चिंच आणि वड आदी पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड करण्यात आली. प्रत्येक विद्यार्थ्याने पर्यावरण संवर्धनाची शपथ घेत वृक्षांचे संगोपन करण्याचा संकल्प व्यक्त केला.
यावेळी खिर्डी ग्रामपंचायतीचे उपसरपंच दिपक खेकारे, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डी. आर. जाधव, प्राध्यापिका श्रीजा अण्णाला, प्रा. कल्याणी सोनवणे, प्रा. मयूर मेश्राम, विकास बोरकुटे, दिपक ताजने तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी प्रतिनिधींनी विशेष परिश्रम घेतले.



