NEET पेपर लीक, विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज आणि सोनम वांगचुक प्रकरणाच्या निषेधार्थ बाजारपेठ बंद, विद्यार्थ्यांना श्रद्धांजली
घुग्घूसमध्ये सर्वपक्षीय बंदचा व्यापक प्रतिसाद

चांदा ब्लास्ट . प्रतिनिधी प्रणयकुमार बंडी
घुग्घूस/चंद्रपूर :- देशभरात गाजत असलेल्या NEET पेपर लीक प्रकरण, दिल्लीतील जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांचे आंदोलन, समाजसेवक व शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा आरोप तसेच आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ गुरुवारी (23 जुलै 2026) घुग्घूस शहरात सर्वपक्षीय बंद पाळण्यात आला. या बंदला शहरातून व्यापक प्रतिसाद मिळाला असून आंदोलनकर्त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत बहुतांश बाजारपेठा व व्यापारी प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आली.
आंदोलनकर्त्यांनी शहरातून पदयात्रा काढून व्यापाऱ्यांना शांततेच्या मार्गाने बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. व्यापारी व नागरिकांनी या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर गांधी चौक येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले. NEET पेपर लीक प्रकरणानंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना यावेळी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपस्थित वक्त्यांनी शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता राखणे आणि युवकांच्या भवितव्याचे संरक्षण करणे ही शासनाची जबाबदारी असल्याचे सांगत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली.
काँग्रेसचे अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात घुग्घूस नगर परिषदेच्या नगराध्यक्षा दीप्ती सोनटक्के, ज्येष्ठ नेते शामराव बोबडे, काँग्रेस नेते सय्यद अन्वर, बांधकाम सभापती रोशन पचारे, आरोग्य सभापती नुरूल सिद्दीकी, वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते नागेश पठाडे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे हेमराज बावणे, अमित बोरकर, रोशन दंतलवार, नगरसेवक दिलीप पिट्टलवार, नगरसेविका आशा पानघाटे, पल्लवी घुले, वैशाली चिकणकर, अर्चना सारोकर, सुनीता पेंदोर, यास्मिन सय्यद, आयेशा अली बुखारी, पूनम कांबळे, मंगला उगे, प्रिती तामगाडगे, अनिरुद्ध आवळे, अलीम शेख, कल्याण सोदारी, देव भंडारी, गजानन मासिरकर, बालू चिकणकर, अजय उपाध्ये, शेखर तंगडपल्ली, प्रशांत सारोकर, गणेश पानघाटे, शहजाद शेख, कुमार रुद्रारप, दीपक कांबळे, सुनील पाटील, निखिल पुनघंटी, शामीउद्दीन शेख, अरविंद चहाडे, बालकिशन कुलसंगे, अन्वर सिद्दीकी तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.
सभेच्या शेवटी आंदोलनकर्त्यांनी शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि लोकशाही मार्गाने होणाऱ्या आंदोलनांबाबत संवेदनशील भूमिका घेण्याची मागणी केली. युवकांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांवर शासनाने ठोस व प्रभावी पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली. संपूर्ण आंदोलन शांततापूर्ण वातावरणात पार पडले.



