महापुरुषांच्या पूर्णाकृती पुतळ्यांसाठी प्रस्तावित स्थळांची आ. किशोर जोरगेवार यांनी केली पाहणी
जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांसह विकासकामांचा घेतला सविस्तर आढावा

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :- शहरातील महापुरुषांच्या पूर्णाकृती पुतळ्यांच्या उभारणीसाठी प्रस्तावित स्थळांची पाहणी आमदार किशोर जोरगेवार यांनी शुक्रवारी (दि. २४ जुलै) जिल्हाधिकारी व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत केली. यावेळी प्रत्येक ठिकाणची उपलब्ध जागा, वाहतूक व्यवस्था, नागरिकांची सुरक्षितता व सोयीसुविधा तसेच भविष्यातील विकासकामांच्या अनुषंगाने आवश्यक बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी वसुमना पंत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, मनपा आयुक्त अकुनुरी नरेश, तहसीलदार विजय पवार, वाहतूक पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, भारतीय जनता पक्षाचे माजी महानगराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, तुषार सोम, नगरसेवक जितेश कुळमेथे तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी व शिष्टमंडळाचे सदस्य उपस्थित होते.
पाहणीची सुरुवात शासकीय विश्रामगृह परिसरातील राजमाता जिजाऊ माँसाहेब व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांसाठी प्रस्तावित स्थळाच्या पाहणीने करण्यात आली. या ठिकाणी जागेची उपलब्धता, वाहतुकीची सुलभता, परिसराचे नियोजन आणि सौंदर्यीकरणाच्या दृष्टीने आवश्यक बाबींचा आढावा घेण्यात आला.
त्यानंतर बंगाली कॅम्प चौक येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी प्रस्तावित जागेची पाहणी करण्यात आली. तसेच गंजवॉर्ड चौकातील राणी हिराई यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी प्रस्तावित स्थळाचीही पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांशी आवश्यक तांत्रिक बाबींवर चर्चा करण्यात आली. या कामांची प्रक्रिया नियोजनबद्ध, दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी बोलताना आ. किशोर जोरगेवार म्हणाले की, महापुरुषांचे कार्य, त्याग, विचार आणि प्रेरणा भावी पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी त्यांच्या स्मारकांचे संवर्धन आणि पूर्णाकृती पुतळ्यांची उभारणी अत्यंत महत्त्वाची आहे. अशा स्मारकांमधून इतिहास जिवंत राहतो आणि नव्या पिढीला प्रेरणा मिळते. या सर्व विकासकामांमध्ये गुणवत्ता, सौंदर्यीकरण, सुरक्षितता आणि नागरिकांच्या सोयीसुविधांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे, तसेच प्रत्येक काम नियोजनबद्ध पद्धतीने आणि निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यात यावे, अशा सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.



